मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. तसेच काहीही करून घरीच राहा असे आवाहन केले आहे. ही परिस्थिती आणीबाणीची आहे. त्यामुळे, घरात कॅरम खेळा, पत्ते खेळा काहीही खेळा पण घरीच राहा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधतो. त्याचा अर्थ केवळ मी नाही तर महाविकास आघाडीच्या सर्वच नेते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील तुमच्याशी संवाद साधला असे समजावे. कारण, कोरोना विरोधात आम्ही सर्वच एक आहोत. मी राज ठाकरेंच्या देखील संपर्कात आहे. गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्राच्या जनतेने आणि या तमाम नेत्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्येच आणखी एक निधी जोडला आहे. यातून कोरोनाग्रस्तांवरील उपचार आणि कोरोनाच्या संकटात पुकारलेल्या लॉकडाउनमध्ये उपाययोजना करण्यात मदत होईल. सकाळीच उद्योजक उदय कोटक यांचा फोन आला. त्यांनी या निधीमध्ये 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अनेक जण आम्ही काय करू शकतो आणि काय करावे म्हणून पुढाकार घेत आहेत. कुणी दान करत आहे, तर कुणी हॉस्पिटलचे सेट-अप उभे करून देत आहेत. मास्क कुठे मिळतील हे सांगत आहेत. आपली टीम एकूणच चांगली झाली आहे. कोणताही देश कुणाच्या मदतीला धावून येणे शक्य नाही. कारण सर्वांची प्रकृती एकसारखी आहे. त्यामुळे, आपल्यालाच आपली मदत करावी लागेल. इतर देशांमधील परिस्थिती पाहून आपण काळजी का घेत आहोत हे लक्षात येत आहे.
कामगारांनी कुठेही जाऊ नये, त्यांना मोफत राहणे-जेवणाची सोय करू
राज्यासह देशभर कामगार आप-आपल्या राज्यांत जाण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यांनी कुठेही जाऊ नये. महाराष्ट्र सरकार त्यांची सोय करेल. त्यांना मोफत जेवण आणि राहण्याची सोय देत आहोत. त्यामुळे, कुठेही जाऊ नका. तुमची मदत आम्ही करू. मुख्यमंत्री कार्यालय केवळ राज्यातच नव्हे, तर बाहेरील राज्यांच्या मजुरांना सुद्धा मदत करत आहे. आपल्या राज्यातील साखर कारखान्यांच्या मालकांनी आपल्या मजुरांची काळजी घ्यावी. त्यांची सोय करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
विनाकारण गर्दी करू नका, कठोर पावले उचलावी लागतील
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू राहतील. पण, विनाकारण केवळ पाहणीसाठी लोक बाहेर पडत आहेत. पोलिस सुद्धा जीवाची बाजी लावून व्यवस्था नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात त्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहेत. मी विनंती करतो की लोकांनी वर्दळ थांबवावी. आपल्या जबाबदारी लक्षात ठेवून त्या पार पाडा. ही एक आणीबाणीचीच परिस्थिती आहे.
तुम्ही देखील सरकारला सहकार्य करा
केंद्र सरकार सुद्धा आपल्या संपर्कात आहे. पंतप्रधानांसह महत्वाचे नेते, मंत्री संपर्कात आहेत. गरजू लोकांना मोफत अन्नधान्य किंवा जेवण जे काही शक्य होईल ते केले जात आहे. शिव भोजनाची थाळी आता 10 वरून 5 रुपये करण्यात आली आहे. सरकार तुमच्यासाठी सर्व करायला तयार आहे. तुम्ही देखील सरकारला सहकार्य करावे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोना विषाणूसंदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी १५ महत्त्वाचे मुद्दे मांडले…
- आज जवळपास ८ दिवस होत आले, संपूर्ण देश लॉकडाउन या परिस्थितीत आहे. पण या दिवसांमध्ये मी सर्वांना धन्यवाद देतोय कारण आपण आपल्या संयमाचे अतुलनीय असे दर्शन घडवलेले आहे.
- जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा माझ्यासोबत आपण सगळे जण आहात. माझ्यासोबत आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील सगळे तिन्ही पक्ष आहेत, त्या पक्षांचे नेते आहेत.
- विरोधी पक्षनेत्यांसोबत सुद्धा माझी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे सुद्धा फोन करून सूचना देत आहे.
- हे संकट मोठे आहे आणि या संकटाशी लढण्यासाठी आपण एक अकाउंट उघडला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्येच एक वेगळा विभाग केला आहे.
- आज सकाळीच मला उदय कोटक यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले “उद्धवजी, आप लढ़ रहे हो, हम आपके साथ है।” आणि त्यांनी १० कोटींची मदत जाहीर केली आहे.
- आपण टीव्हीवर बघतो की, ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची काय परिस्थिती आहे, फार वाईट आणि भीषण परिस्थिती आहे. ती दृश्य बघितल्यानंतर आपण काळजी का घेण्याची गरज आहे हे आपल्या लक्षात येईल.
- संपूर्ण राज्यात नव्हे, संपूर्ण देशात इतर राज्यांतील कामगार हे त्यांच्या घरी जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की इतर राज्यातील कामगार जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, कृपा करून जिथे आहात तिथेच थांबा. आपली पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे.
- साखर कारखान्यांना मी विनंती करतो आहे, आपला जो कर्मचारी वर्ग आहे, कृपा करून आपण आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या.
- मी सर्वांना विनंती करतो की आपण संयमाचं अतुलनीय दर्शन घडवत आहेत पण अजूनही काही वस्त्यांमध्ये, विभागांमध्ये वर्दळ होत असेल तर ती वर्दळ ताबडतोब थांबवा. विनाकारण सरकारला कठोर पावले टाकायला लावू नका.
- ही आणीबाणी आहे आणि आणीबाणी म्हटल्यानंतर प्रत्येकाने आपापले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून वागलचं पाहिजे आणि ती वागण्याची विनंती मी तुम्हाला करतो.
- केंद्र सरकार सुद्धा आपल्यासोबत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, प्रकाश जावडेकर माझ्याशी बोलत आहेत.
- आपली जी आपण जेवणाची केंद्रे उघडली आहेत, ती ठिकठिकाणी उघडली आहेत तिथे आपण मोफत जेवणाची सोय केली आहे. शिवभोजन सुद्धा जे आपण १० रुपयाने देत होतो ते आपण पुढच्या ३ महिन्यासाठी ५ रुपयाने देत आहोत.
- डॉक्टर लोकांचा मला अभिमान आहे. अभिमान एवढ्यासाठी की हे भयानक संकट असताना या डॉक्टरांचं मला खरंच कौतुक करावं वाटते. त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मानाचा मुजरा करतो.
- आज रविवार आहे, रविवार सुट्टीचा दिवस आहे. पण ही मंडळी रविवार असो वा नसो, आपल्यासाठी अहोरात्र २४ तास जीवावर उदार होऊन मेहनत करत आहेत. खूप मोठं धोक्याच काम आहे.
- आपण आता चाचणी केंद्र आणि टेस्ट करण्याच्या सुविधा वाढवलेल्या आहेत. एक गोष्ट अपेक्षित आहे की करोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे पण ती अपेक्षेप्रमाणे वाढली पाहिजे, त्याच्या पलीकडे वाढता कामा नये.