पुणे-वडगाव शेरी मतदार संघातील भाजपचे महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी आज शिवसेना, रिपाई, रासप महायुतीचे नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत विधानसभा निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
या रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकत्यांनी सहभागी झाले होते. त्यानंतर आमदार जगदीश मुळीक पत्रकारांशी बोलले.
- भामा-आसखेड योजनचे काम ९० टक्के पुर्ण
वडगाव शेरीच्या विकासासाठी मी कटिबंध्द आहे. वडगाव शेरी मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे केली आहेत. विकास कामांमुळे जनतेशी नाळ जुळली आहे. नागरिकांचा कौल भाजपाच्या बाजूने असल्यानं माझा विजय निश्चित आहे, असा विश्र्वास आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.
यावेळी मुळीक म्हणाले, ”वडगावशेरी मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकासकामे केली आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. वाघोली पर्यंत मेट्रोचा प्रस्ताव सादर केला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चार उड्डाणपुल आणि नदीपात्रावरील पुल करण्याचे नियोजन केले. भामा-आसखेड योजनचे काम ९० टक्के पुर्ण झाले आहे. समान पाणी पुरवठा योजनाचे काम सुरू आहे. लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण केले आहे.”
- वडगाव शेरीची वाटचाल टँकरमुक्तीकडे
मुळीक पुढे म्हणाले, ”वडगाव शेरीची वाटचाल टँकरमुक्तीकडे चालू आहे. डॉ आंबेडकर शासकीय वसतीगृहाचे निर्माण, एमएनजीएलव्दारे हजारो घरांमध्ये पाईपलाईनमार्फत गॅस पुरवला जात आहे. हरित वडगावशेरीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, विश्रांतवाडीतील पाम उद्यान, खराडीतील बोलद्यान, वडगाव शिंदे येथे वनपर्यंटन केंद्र करत आहे. तारकेश्र्वर देवस्थानला क दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित केले आहे. लोहगाव येथील हरिण तळाचा विकास करण्यासाठी जवळपास दोन कोटीचा निधी मंजुर केला आहे.”
विकास कामाविषयी बोलताना मुळीक म्हणाले, ”मतदार संघामधील नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेकडो ओपन जीम तयार केले आहे. येरवडा राजीव गांधी रुग्णालयामध्ये डायलेसिस आणि डायग्नेसिस केंद्र आणि लोहगाव येथे शंभर खाटांचे रुग्णालय होणार आहे. अकरा गावांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतुद केली. लोहगाव, वडगाव शिंदे, निरगुडी, मांजरी येथे अकरा कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा न देता मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी कोट्यावधीचा निधी आणला. मतदार संघाचा विकास करणे हा अजेंडा डो्ळयासमोर ठेवून मी प्रामाणिक काम केले आहे. यामुळे सर्व समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.”