नवी दिल्ली: जागा वाटपावरून निर्माण झालेली शिवसेना-भाजप युतीची कोंडी अखेर फुटली असल्याचं वृत्त आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप १४४, शिवसेना १२६ आणि इतर १८ जागांवर लढणार असल्याचं आज झालेल्या भाजपच्या बैठकीत नक्की झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. मात्र त्याला अद्याप कुणी दुजोरा दिलेला नाही.दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. गेल्या नऊ तासांपासून सुरू असलेल्या या बैठकीत शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्याचं नक्की झालं असून सेनेला १२६ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भाजपने १४४ जागांवर लढण्याचं ठरलं असून रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती सेनेला मिळून १८ जागा सोडण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. मात्र सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रविवारी युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.