मुंबई- राज्यातील महाविकास आघाडीमधील पक्षानी शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर, भाजप सेनेबद्दल सकारात्मक विचार करेल आणि “राजकीय तडजोड करण्यास तयार आहे,” असे मत भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरुन 30 वर्षांची युती तोडून शिवसेनेनं भाजपची साथ सोडली. त्यानंतर आपले वैचारिक शत्रू असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करुन राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन केले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नागरिकत्व कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणीही अशिष शेलारांनी केली आहे. तसेच, त्यांनी सांगितले की, “केंद्र सरकार राज्यात नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेस पक्ष या निर्यणाविरुद्ध आहे. त्यामुळे जर त्यांना हे मान्य नसेल आणि ते सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास तयार असतील, तर आम्ही सकारात्मक विचार करू आणि सेनेला साथ देऊ,” असे शेलार म्हणाले.
पुढे बोलताना शेलार म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी फक्त आपल्या सरकारचा विचार न करता देशहिताचा विचार करावा. नागरिकत्व विधेयक हे देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी आहे.” या नव्या विधेयकानुसार बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगानिस्तानमधून आलेल्या हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन आश्रीतांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल.