भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
मुंबई-महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी घोर फसवणूक करत आहे. त्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली राज्यभर लाखो शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
श्री पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे फसवून सत्तेत आलेलं सरकार आहे. जनादेश नसताना, सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करुन अभद्र आघाडी करुन सत्तेत आलं. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकऱ्यांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा श्री पाटील यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि स्वत:ला राज्याचे जाणते राजे म्हणवून घेणारे शरद पवार यांनी सरकार स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांची दु:खं दूर करू असं आश्वासन दिलं होतं. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत देऊ असा शब्द दिला होता. पण सत्तेत आल्यावर त्यांना याचा विसर पडला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रपती राजवटीमुळे माननीय देवेंद्र फडणवीस यांचे काळजीवाहू सरकार अस्तित्वात होते. त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून दिली. पण महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय उद्धवजी आणि शरद पवारांनी केलल्या हेक्टरी २५ हजार नुकसानभरपाईच्या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. अन् जनतेला ही याचा विसर पडावा म्हणून सरसकट कर्जमाफीऐवजी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. त्यातही २०१५ नंतर ते २०१९ पर्यंत कर्जमाफ केली. पण २०१९-२०२० मधील कर्जमाफीचे काय झालं असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना श्री. पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना हेक्टरी, गुंठेवारी यातील फरक देखील कळत नाही आहे. त्यांना केवळ मुंबईतील जमीनीच्या किमती कळतात. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यातील फरक समजून घ्यावा, असा टोला ही श्री पाटील यांनी यावेळी लगावला.
महाविकास आघाडीवर बोलताना श्री पाटील म्हणाले की, सध्या हे सरकार शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलने चालतं. पवार साहेबांचा प्रत्येक शब्द माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानना लगेच समजतो. त्यामुळे ते त्यांना हवं तसंच काम करतात. त्यांना राज्यातील जनतेच्या प्रश्नांचं देणंघेणं नाही. शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार यावर त्यांनी मौन बाळगले आहे.
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत, प्रवीण पोटे, संजय कुटे, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदेश भाजपाच्या धरणे आंदोलनात अडीच लाख कार्यकर्त्यांचा सहभाग
राज्यातील महाआघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराविरोधात तसेच राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात सुमारे ३५५ ठिकाणी झालेल्या धरणे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी झालेल्या आंदोलनात अडीच लाखाहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज आहिर या मान्यवरांसह पक्षाचे खासदार,जिल्हा, तालुका, महानगर, शहर पातळीवरचे पदाधिकारी तसेच जि.प.अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जि.प., पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पक्षाच्या सर्व आमदारांनी मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. सामान्य जनतेनीही या आंदोलनाला प्रतिसाद देत महाआघाडी सरकारच्या विरोधातील असंतोष प्रकट केला.
महाआघाडी सरकारने भाजप सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना रद्द केल्या आहेत्त. जनादेशाचा घात करत स्थापन झालेल्या या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा एक रुपयाचीही जादा मदत महाआघाडी सरकारने दिलेली नाही. महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा निष्क्रिय आणि फसवाफसवी करणाऱ्या सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय नवी मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात घेण्यात आला होता. त्यानुसार आज हे आंदोलन करण्यात आले.