नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. केजरीवाल यांनी येताच भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरमचे नारे दिले. यावेळी केजरीवाल म्हणाले, ‘दिल्लीवालो, गजब कर दिया… आय लव्ह यू’. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचा आणि विकासाचा हा विजय आहे. आज मंगळवार हनुमानजीचा दिवस आहे. त्यांची दिल्लीवर कृपा झाली, असंही केजरीवाल म्हणाले.
दिल्लीकरांचे मनापासून आभार. तिसऱ्यांना तुम्ही आपल्या मुलावर विश्वास दाखवला. हा माझा विजय नाही हा सर्व दिल्लीकरांचा विजय आहे. दिल्लीत प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे ज्यांनी आपला मुलगा समजून मला दणदणीत मतांनी विजयी केलं. मोफत वीज, उत्तम शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळणाऱ्या दिल्लीकरांचा हा विजय आहे, असं केजरीवाल म्हणाले.
एका नव्या स्वरुपातील राजकारणाला सुरुवात झालीय, असं दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकतर्फी विजय मिळवल्यानंतर केजरीवाल म्हणाले. जो स्वस्त वीज आणि प्रत्येक घराला पाणी देईल आणि गल्ल्यांतील रस्ते बनवेल त्यालाच मत मिळेल, नागरिकांनी दाखवून दिलंय. ही नव्या राजकारणाची मुहूर्तमेढ आहे. हा नवा संकेत आहे. हा फक्त दिल्लीचा विजय नाही तर भारत मातेचा विजय आहे, संपूर्ण देशाचा विजय आहे, असं केजरीवाल म्हणाले.