संस्थापक संचालक पुलेला गोपीचंद म्हणतात, या उपक्रमामुळे कोचिंगचा दर्जा उंचावेल आणि देशात गुणी खेळाडूंची संख्या वाढेल.
- बॅडमिंटन गुरुकुलमार्फत आम्ही आपल्या कोचेसबद्दल आदर आणि सन्मान राखणारी संस्कृती व आपल्या माजी खेळाडूंसाठी कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर करिअर संधी निर्माण करत आहोत – संस्थापक व एमडी सुप्रिया देवगुण
मुंबई: गेल्या काही वर्षात भारतात बॅडमिंटन खेळामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचा दबदबा वाढत असून बॅडमिंटन पॉवरहाऊस अशी भारताची नवी ओळख निर्मण होत आहे. परिवर्तनाचा हा ओघ असाच पुढे कायम राहावा आणि वाढत जावा यासाठी तळागाळातील स्तरावर क्रीडा विकास कार्यक्रम राबविण्याबरोबरीनेच खेळ प्रशिक्षणामध्ये देखील लक्षणीय बदल घडवून आणण्याची गरज आहे. बॅडमिंटन सुपरस्टार व गुरु पुलेला गोपीचंद आणि माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू सुप्रिया देवगुण यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.बॅडमिंटन गुरुकुलने टाटा समूह व असोसिएट पार्टनर्स टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुप यांच्या सहयोगाने देशभरात १४ शहरांमध्ये २८ प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. याठिकाणी २० माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टार्सच्या मार्गदर्शनाखाली १००० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सुरुवातीला साध्या व लहान स्तरावर सुरु केल्या गेलेल्या या उपक्रमामध्ये देशातील सर्वोत्तम प्रशिक्षकांचा समावेश केला जाईल आणि युवा विद्यार्थ्यांना खेळ शिकण्याच्या बरोबरीनेच निरोगी जीवनशैलीचेही धडे मिळावेत यासाठी साचेबद्ध व सुनियोजित कार्यक्रम तयार करण्यात येईल.
आज मुंबईत पार पडलेल्या विशेष पत्रकार परिषदेत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भारतीय राष्ट्रीय प्रशिक्षक आणि बॅडमिंटन गुरुकुलचे मार्गदर्शक, संस्थापक व संचालक श्री. पुलेला गोपीचंद यांनी सांगितले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाडूंनी मिळविलेले घवघवीत यश, गेल्या काही वर्षात बॅडमिंटन खेळाच्या लोकप्रियतेमध्ये झालेली अनपेक्षित वाढ, बॅडमिंटन कोर्टांची वाढलेली संख्या यामुळे देशभरात दर्जेदार बॅडमिंटन प्रशिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन बॅडमिंटन गुरुकुलने ज्ञान व माहितीची देवाणघेवाण करणारा हा अनोखा मंच तयार केला आहे ज्यामध्ये आम्ही माजी खेळाडूंना पुढे घेऊन येत आहोत, जेणेकरून युवा, उदयोन्मुख शटलर्सना त्यांच्या अनुभवांचा लाभ मिळू शकेल. हे फक्त प्रशिक्षण नसेल तर त्याही पलीकडे जाऊन खेळाडूंच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल. या खेळाडूंनी सर्वोत्तम दर्जाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा अनुभव घेतला आहे, सर्वात वरच्या पातळीवर पोहोचून यश संपादन करण्यासाठी किती कठोर मेहनत व जिगर आवश्यक असते ते त्यांना ठाऊक आहे कारण त्या पातळीवर जाऊन ते स्वतः खेळले आहेत. हा सर्वोत्कृष्ट मिलाप घडून आलेला असून, मला खात्री आहे की यामुळे देशभरात प्रशिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि देशातून खूप मोठ्या संख्येने गुणवान खेळाडू निर्माण होतील.”
माजी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू व बॅडमिंटन गुरुकुलच्या संस्थापक व मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती सुप्रिया यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांची मने जिंकली, त्या म्हणाल्या, “बॅडमिंटन गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशातील प्रशिक्षकाविषयी आदर आणि सम्मान राखणारी संस्कृती निर्माण करत आहोत, आपापल्या काळातील या दिग्गज खेळाडूंसाठी कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर एक करिअर संधी उपलब्ध करवून देत आहोत. उच्च दर्जाचे, व्यावसायिक पद्धतीने चालविलेले कार्यक्रम, साचेबद्ध, मानकीकृत संचालन आणि विशिष्ट अभ्यासक्रम या सर्वातून आम्ही या खेळाला एका विशाल संस्थेचे स्वरूप देऊ पाहत आहोत. खेळ ही जीवनशैली बनावी, मुलांनी पदके आणि बक्षिसांच्या पलीकडे जाऊन खेळाचा विचार करावा असे प्रयत्न आम्ही बॅडमिंटन गुरुकुलच्या माध्यमातून करत आहोत. एखादी व्यक्ती पैसे किती कमावते हे त्याचे यश मोजण्याचे माप होऊ शकत नाही, तर त्या खेळामार्फत आम्ही किती लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, ते महत्त्वाचे आहे असे आम्ही मानतो. हा बदल खेळ शिकविल्यामुळे घडून आलेला असेल किंवा प्रशासक, प्रशिक्षक या भूमिकांमधून तुम्हाला पुन्हा एकदा खेळाकडे आणल्यामुळे घडून आलेला असेल, आमच्यासाठी तेच आमचे व तुमचे यश आहे. बॅडमिंटन गुरुकुलमध्ये हेच यश आमचे लक्ष्य आहे.”
अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम कॉर्पोरेट सहयोगाखेरीज संभव होऊ शकत नाही. बॅडमिंटन गुरुकुलसोबत टाटा समूहाच्या सहयोगाविषयी टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडियन श्री. हरीश भट यांनी सांगितले, “बॅडमिंटन गुरुकुलसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या उपक्रमामुळे देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण कौशल्ये एकत्र आणली जातील आणि युवा खेळाडूंना एका साचेबद्ध, सुनियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून खेळामध्ये उत्तम कामगिरी करून दाखविण्यास मदत मिळेल. गेले एक दशकभर टाटा समूह भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून विविध खेळांमधील खेळाडूंना टाटा समूहाने पाठिंबा दिला आहे. आम्ही असे मानतो की, सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चालना देण्याची क्षमता खेळांमध्ये असते. निरोगी व सर्वसामावेशी समाज निर्मितीमध्ये खेळ महत्त्वाची भूमिका निभावत असतात.”
बॅडमिंटन गुरुकुलचे असोसिएट पार्टनर्स असलेल्या टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. रवीकुमार स्वामिनाथन यांनी सांगितले, “खेळ आणि खेळाडू यांना कॉर्पोरेट क्षेत्राकडून पाठिंबा व मदत मिळणे किती महत्त्वाचे आहे हे जाणूनच टीव्हीएसने बॅडमिंटन गुरुकुल उपक्रमाला सहयोग देण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमातून देशात खेळाच्या विकासाला चालना मिळण्याच्या बरोबरीनेच खेळाडूंचा देखील विकास होणार आहे. आपल्या देशात बॅडमिंटन खेळ अतिशय लोकप्रिय आहे आणि आपल्या बॅडमिंटनपटूंना जगभरात नावाजले जाते, त्यामुळे या उपक्रमाला साथ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”
बॅडमिंटन गुरुकुल
पद्म भूषण विजेते श्री. पुलेला गोपीचंद यांनी सुरु केलेल्या बॅडमिंटन गुरुकुल या उपक्रमाला अनेक आजी व माजी ऑलीम्पियन्स, आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय चॅम्पियन्स व खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रमांपासून उत्साही वयस्कांपर्यंत सर्वांचा समावेश यामध्ये करून घेतला जात असल्यामुळे या उपक्रमामुळे देशात बॅडमिंटन खेळाडूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ घडून येईल.
भारतात सर्वत्र एक प्रभावी व शाश्वत शारीरिक साक्षरता कार्यक्रम उपलब्ध करवून देण्यामध्ये लक्षणीय योगदान देण्यावर त्यांचा भर आहे. श्री. पुलेला गोपीचंद यांनी स्वतः निवडलेल्या उच्च कौशल्ये व गुणवत्ता अंगी असलेल्या, प्रशिक्षित प्रशिक्षकांमार्फत सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन देशभरात उपलब्ध करवून दिले जाते, मानकीकृत अभ्यासक्रम, मजबूत पायाभूत सोयीसुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान ही बॅडमिंटन गुरुकुलाची वैशिष्ट्ये आहेत.
बॅडमिंटन खेळाचा एखाद्या विशाल संस्थेप्रमाणे साचेबद्ध विकास व्हावा, माजी खेळाडूंना कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर करिअर संधी उपलब्ध व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. याठिकाणी प्रत्येक नवख्या विद्यार्थ्याला अनुभवी, कुशल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते, आंतर बॅडमिंटन गुरुकुल स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळते आणि त्यांच्यामध्ये चमक आहे असे दिसून आल्यास खेळात अजून जास्त कामगिरी करून दाखविण्यासाठी त्यांना पुढील मार्ग देखील खुला करून दिला जातो.
टाटा ग्रुप
१८६८ साली जमशेटजी टाटा यांनी स्थापन केलेला टाटा समूह गेली कित्येक वर्षे जागतिक स्तरावरील ख्यातनाम उद्योगसमूह म्हणून नावाजला जात आहे. टाटा ग्रुपचे मुख्यालय भारतात असून १० उद्योग विभागांमध्ये कार्यरत ३० कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. जगभरातील सहा खंडांमध्ये १०० पेक्षाही जास्त देशांमध्ये हा उद्योगसमूह विस्तारलेला आहे. ‘जे ग्राहक आमच्या सेवा व उत्पादने वापरतात त्याच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे, त्यासाठी विश्वासावर आधारित नेतृत्वाच्या माध्यमातून हितधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे’ हे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन टाटा ग्रुप सातत्याने पुढे जात आहे. टाटा सन्स ही या उद्योगसमूहातील प्रमुख गुंतवणूकदार असून टाटा कंपन्यांची प्रमुख प्रमोटर आहे. टाटा सन्सचे ६६% इक्विटी शेअर कॅपिटल लोकोपकारी विश्वस्त संस्थांच्या अखत्यारीत असून त्याच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, कला, संस्कृती यांना प्रोत्साहन दिले जाते. २०१७-१८ मध्ये टाटा कंपन्यांनी एकूण ११०.७ बिलियन डॉलर्स महसूल नोंदवला. या सर्व कंपन्यांमध्ये मिळून ७००००० कर्मचारी काम करतात.
प्रत्येक टाटा कंपनीचे स्वतःचे स्वतंत्र संचालक मंडळ आहे. सार्वजनिक दृष्टया नोंदणीकृत २८ टाटा उद्योग असून त्यांचे एकत्रित बाजार भांडवल जवळपास १४५.३ बिलियन डॉलर्स आहे (३१ मार्च, २०१८ नुसार). या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टायटन, टाटा कॅपिटल, टाटा पॉवर, टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स, इंडियन हॉटेल्स व टाटा कम्युनिकेशन्स यांचा समावेश आहे.
गेली ७५ वर्षे खेळ हा टाटा समूहाचा अविभाज्य भाग आहे. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, ऍथलेटिक्स, पर्वतारोहण व मोटार शर्यत यासारख्या अनेक खेळांना पाठिंबा देऊन अनेक पुरस्कार विजेते खेळाडू निर्माण केले आहेत, अनेक खेळाडूंच्या संघांना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना, प्रशिक्षण केंद्रांना मदत केली आहे. देशभरातील टाटा समूहाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी १९३७ साली टाटा स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली गेली.
टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुप:
टीव्हीएस लॉजिस्टिक्स ग्रुप हा जागतिक पातळीवरील समूह असून फ्राईट फॉरवर्डिंगपासून अगदी शेवटच्या टप्प्यातील पुरवठा व वेअरहाऊसिंगपर्यंत सर्व पुरवठा शृंखला सेवा हा समूह पुरवतो.
आंतरराष्ट्रीय कंपन्या, सरकारी विभाग, मोठे व मध्यम आकाराचे व्यवसाय, व्यापार यांच्यामध्ये निर्माण होणारी पुरवठा शृंखला आव्हाने ही कंपनी दूर करते. आपल्या क्षमतांच्या बळावर ही कंपनी आपल्या ग्राहकांचे संचालन खर्च कमी करते आणि त्यांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणते.
सध्या भारतात सर्वत्र औद्योगिक इमारती व गोदामे मिळून जवळपास १२.५ मिलियन चौरस फूट जागेवरील बांधकामांचे प्रकल्प या कंपनीकडे आहेत. वेगाने विकसित होत असलेल्या भागांमध्ये लॉजिस्टिक्स पार्क्स व वेअरहाऊसिंग सेंटर्स निर्माण करण्याची त्यांची योजना आहे.