पुणे : ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ यासारखी ठसकेबाज लावणी, ‘मॉ तुझे सलाम’सारखे देशभक्ती जागविणारे गीत, ‘बाहो मे चले आ’सारखे रोमँटिक गीत या आणि अशा भावनाप्रधान गाण्यांच्या सादरीकरणाने नवीन पिढीतील गायक-वादकांनी संगीतरजनी फुलवली. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी ‘संगीतरजनी’ या विशेष कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या अप्रतिम अदाकारीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अभिषेक सराफ, वेदा नेरुरकर आणि क्रिशा चिटणीस यांनी आपल्या सुमधूर गायनाने नवीन आणि जुन्या हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण केले. आरजे बंड्या आणि आरजे सानिका यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. तुषार दिक्षित, ओंकार पाटणकर (किबोर्ड), गौरव जोशी (बेस गिटार), संकेत नाशिककर (लिट गिटार), सागर साळुंके (बासरी), अभिषेक भुरुक (ड्रम्स), यांनी साथसंगत केली. ‘दुर्गे दुर्गट भारी’ या देवीच्या आरतीने आणि ‘मोरया मोरया’ या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘कजरा मोहब्बतवाला’, ‘आओ हुजुर तुमको’, ‘सितारो मे ले चलू’ यांसारख्या हिंदी गीतांसह ‘डिपाडी डिपांग’, ‘अश्विनी ये ना’, ‘जीव रंगला’ अशा मराठी गीतांनी रसिकांच्या मनाला भुरळ घातली.