मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हळु-हळू राज्यात वाढत आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वरुन थेट 63 वर गेली आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे, यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांची भेट घेतली. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.राज्यातील एकूण ६३ रुग्णांपैकी १४ लोकांना संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. आज सापडलेल्या ११ रुग्णांपैकी आठ जण विदेशातून आले होते. तर, तिघांना संसर्गातून लागण झाल्याचं टोपे यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, ‘शरद पवारांशी चर्चा झाली, त्यांना सध्याची परिस्थिती सांगितली. केंद्राने आपल्याला चाचण्यांची परवानगी द्यावी, मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग लॅब आम्हाला करायच्या आहेत, फक्त किट्स केंद्राने उपलब्ध करुन द्यावेत, अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केली.’
पुढे ते म्हणाले की, या चर्चेदरम्यान, पवारांनी तातडीने केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी 20 मिनिटे चर्चा केली. राज्य सरकार मेडिकल कॉलेजना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. पण मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करुन द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असेही टोपे म्हणले.
जनतेनं खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ‘घरातील, ऑफिसमधील एसी बंद ठेवा. लोकलचा वापर टाळा. रेल्वे स्थानकांतील गर्दी कमी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकड केली आहे, असं टोपे यांनी सांगितलं.