मुंबई -शिवसेना कधीच पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेनेने नेहमीच दिलेला शब्द पाळला, हीच आमची भूमिका आहे. 2014 आ णि 2019 मध्ये खूप फरक आहे. त्यावेळी भाजपने अल्प मताचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आता ते करणे त्यांना शक्यच नाही. बहुमत असेल तर सरकार स्थापित होईल अन्यथा जनतेला सामोरे जाऊ शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील ती सर्वांना मान्य राहील असे सर्वांनी सांगितले आहे. 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. तेव्हापासूनच शिवसेनेने आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे स्वतःहून युती तोडण्याचे पाप करणार नाहीत. मुख्यमंत्री पद आणि सरकारच्या सम-समान वाटपावरून शिवसेना माघार घेणार नाही असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल हे सभागृहात दाखवू
शिवसेना कधी आशेवर जगत नाही आत्मविश्वासावर जगते. लोकांचा पाठिंब्यावर शिवसेनेने प्रवास केला. भाजपने जाहीर करावे की ते सत्ता स्थापित करू शकत नाही. त्यानंतर शिवसेना पुढील पावले उचलणार आहे. सोबतच, शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा आणि कधी होणार, कोण पाठिंबा देणार हे सभागृहातच दाखवू असे संजय राउत म्हणाले आहेत.
यामुळे हॉटेलात थांबले शिवसेना आमदार
शिवसेना आमदार महाराष्ट्रातील विविध भागातून येतात. मुंबईतील मनोरा आमदार निवास तोडण्यात आले आहे. त्यांना राहण्यासाठी नवीन आमदार निवास नाही. त्यामुळेच, शिवसेनेचे नवीन आमदार मुंबईतील एका हॉटेलात थांबले आहेत असे संजय राउत म्हणाले. आमदारांची खरेदी किंवा विक्री होत असल्याच्या भीतीने त्यांना हॉटेलात ठेवण्यात आलेले नाही. आम्हाला कुणाचीही भीती नाही. सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना कधीही आमदारांची गरज पडू शकते. त्यांनी एकत्रित राहावे त्यामुळेच एका ठिकाणी हॉटेलात थांबवण्यात आले आहे असेही ते पुढे म्हणाले.