मुंबई:
छत्रपतींचं नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी तो पुन्हा पुन्हा करायला तयार आहे. जो आपलं दैवत, आईवडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही. ज्यांची शपथ घेऊन हा कारभार आपण सुरू करत आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आम्ही घडवू, अशी ग्वाही देत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात विरोधकांना फटकारले.’शिवरायाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार…’अशा शब्दांत उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘आयुष्यात पहिल्यांदाच मी या सभागृहात आलो आहे. सभागृहात आलो हे माझं भाग्य. येताना छत्रपती शिवरायांना वंदन करू आलो. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. हे दैवत ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीत जन्माला आलेले आपण सारे शिवभक्त. या सभागृहात वागायचं कसं, हा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण मी मैदानातला माणूस, मला वैधानिक कामाचा अनुभव नाही. पण इथे आल्यावर वाटलं की यापेक्षा मैदानात बरं असतं. आज मी मोकळ्या बाकांशी लढणार नाही. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणारा मी नाही. मी शत्रूला अंगावर घेणारा आहे.’ ‘सभागृहात आल्यानंतर मी या फुले, शाहू, आंबेडकरांच्या तसबिरी पाहिल्या. छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र, असं आपण केवळ भाषणात म्हणायचं आणि प्रत्यक्षात या महापुरुषांचा आदर ठेवायचा नाही, याला काय अर्थ? केवळ छत्रपतींचं नाव घेऊन शपथ घेतली तर यांना इंगळ्या डसाव्या? हो, मी छत्रपतींची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन. छत्रपतींचं नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी तो एकदा नाही, दहादा नाही, प्रत्येक जन्मात करीन,’ असं उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितलं.