..खुशमस्करेच प्रगतीपथावर …(काहीही न करणारे , नेत्यांना जास्त प्रिय)
निवडणूक प्रचाराचे बदलले तंत्र आणि मंत्र
….बदलले नेते ही आणि कार्यकर्ते ही
१९८३ …. पतित पावन संघटनेच्या कामात असतानाच प्रभात रोड भागातून पुणे मनपा ची पोटनिवडणूक लागली.पतित पावन संघटनेचे प्रमुख नितीन सोनटक्के यांच्या समवेत अण्णा जोशी आणि बापट साहेबांना भेटायला कमला नेहरू पार्क येथे गेलो ती माझी पुण्याच्या निवडणुकीची पहिली ओळख.साध्या वेशात सामान्य माणसासारखे वागणारे बोलणारे बापट साहेब स्कूटर वर आले होते.कोणत्यातरी कारणाने नितीनराव आणि अण्णांचे तावातावाने बोलणे झाल्याचे आठवते,पण त्यानंतर आम्ही प्रचार कार्यात झोकुन दिले.१७ /१८ वर्षाचे गरम रक्त आणि त्यातून पतित पावन संघटने सारख्या आक्रमक संघटनेचा कार्यकर्ता.निवडणुकीचे काम काय – तर *टिळक टॅंक* च्या गल्लीत दोन खांबामधे सुतळी बांधली व नितीनरावांच्या प्रेस मधील खळ वापरून पताका चिटकवल्याचे स्मरते.( त्यातील थोडी खळ शिल्लक होती, त्याचा दुसऱ्या दिवशी उपयोग केला तो मांजा करायला,कांचेचा चुरा केला आणि तो खळ वापरुन दोऱ्यावर लावला आणि वाळवत बसलो ) असा तो *बालिश* काळ. नितीनरावांच्या प्रेस मधे खिळे लावून अक्षर जुळवणी करत कसलेसे पत्रक छापले आणि सुरु झाला हाऊस टू हाऊस प्रचार. त्यानंतर १९८५ ची मनपा निवडणूक आठवते जेव्हा आमची बैठक डेक्कन वरील बटाविया मेडीकल च्या गच्चीवर होत असे.बल्ब बरोबर घेउन जाऊन गच्चीवर लाईट लावायचे आणि सतरंजी झटकली की धुळीचे लोट उडायचे.
*भेळभत्त्याचे* दिवस ते. *पोते भर मुरमुरे* त्यात नाममात्र *फरसाण* आणि बुक्कीने कांदा फोडून खाणे. कधीतरी कोणी मेहेरबान झाले तर ढापशे ची भजी किंवा तेथेच अंडाभुर्जी वर ताव मारल्याचे स्मरते पण असे प्रसंग अपवादात्मक.बापट साहेब विजयी झाल्यावर साडे चार/पाच रुपयांची सुवर्णरेखा डायनिंग हॉल (प्रभात रस्त्यावरील) थाळी खाल्ल्याचे मात्र लक्ख आठवते. रविवारी फीस्ट असल्याने *जिलेबी मठठा* ची मेजवानीच होती ती.पण महत्त्वाचे म्हणजे त्याची *अपेक्षा* नाही केली कधी.१९९२ साली पतित पावन संघटना म्हणून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे ठरवले आणि कोथरूड मधुन दिलीप उंबरकर ,अनंतराव भोज ,पी के कुलकर्णी, विक्रम मानवतकर असे अनेक जण उभे राहिले.
*साधन संपत्तीचा* अभाव आणि उन्हातान्हात न दमता प्रचार.दुपारी *पी के कुलकर्णी* यांच्या आईने केलेली दाण्याची चटणी,भाकरी ,कोरडे पिठलं आणि वरणभातावर ताव मारायचा,बसल्याबसल्या डुलकी मारायची आणि पुन्हा प्रचाराला सज्ज.त्या काळात इनमिन सात वृत्तपत्रे,त्यात ही *संध्या* आमचा आवडता,सनसनाटी हेडलाईन आणि *वसंतराव काणेंची* मार्केटिंग स्ट्रॅटेजी(आणि माझ्यावर प्रेम ) मुळे संध्याकाळी संध्या सर्वत्र जायचा.मी सायकल वर कॅंप मधील हेराल्ड च्या कार्यालयात *हॅरी डेव्हीड* सरांकडे पत्रक नेउन द्यायचो हे आज *हास्यास्पद* वाटेल पण ती तळमळ होती कार्यकर्त्यांच्या मनात.अनेक निवडणुकांचे निस्पृह कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव सांगता येतील.पण आजच्या निवडणुकांमध्ये ते सगळेच *कालबाह्य* वाटेल. आज *पैश्याला मोल* आला आहे,
*मोबाईल,चकाचक गाड्या,झकपक स्टेज,फ्लेक्स,दिव्यांची रोषणाई,मुबलक चकचकीत पत्रके,सतत चहा नाश्ता ठंड पेयांचा मारा,रॅलीसाठी पेट्रोल ची सोय आणि जेवायला बिर्याणी किंवा गोड धोड* . हे सगळे नव्हते ८०/९० च्या दशकात पण *एकमेकांच्या प्रती प्रेमभाव* घट्ट होते,
*पक्षनिष्ठा होती,ज्येष्ठांचा आदर* होता,
*पक्षाच्या भूमिकेशी -आदर्शां शी* बांधीलकी होती,कोणत्याही निर्णयावर ” असे का ” म्हणून विचारल्याचे स्मरत नाही.निस्पृहता म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण त्या काळात पहायला मिळे.पक्षाचे कोणीही *सीनियर आले तर आम्ही उठून* उभे रहायचो ( आता वरिष्ठांना कोणी उठून खुर्ची ही देत नाही ) असे बदल घडत गेले त्याला कारण म्हणजे *अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जोडीला अमाप पैसा*.सर्व काही *पेड यंत्रणेवर* *पॅकेजवर* अवलंबून.
*कार्यकर्ता राहिला कुठे* ? *सगळेच नेते झालेत*,आसुरी महत्त्वकांक्षेचे पंख फुटलेत आणि मग काहीही कष्ट न करता *पूर्वजन्मीच्या संचितावर एखादा माननीय होत असेल तर मी का नाही* ही भावना मूळ धरु लागली आणि *राजकारणाला उतरती कळा लागली*.कार्यकर्त्यांचे गट पडले आणि ते वेगवेगळ्या नेत्यांचे समर्थक म्हणून ओळखले जावु लागले. *पक्षाचे कोण* असा प्रश्न पडावा इतपत सर्वच पक्षात *व्यक्तीनिष्ठ गटबाजी* वाढीस लागली.त्याची *काटेरी फळं आता सर्वपक्षीय नेत्यांना* (चाखायला)बघायला मिळतात. फक्त सभा ,रॅली याला गर्दी करणारे तरुण मस्टर वर सही करुन गायब व्हायला लागले. *याद्या फोड* म्हणजे काय हे ही अनेकांना माहिती नाही आणि हाऊस टू हाऊस प्रचार ही….निरोप सुद्धा Whatsapp वर.उत्स्फूर्तपणे भाषण ऐकायला जाणारे रोडावले आणि लाखांच्या सभेचे दृश्य ही लोपले. *वच्चा रे वच्चा – कमळ वच्चा* ह्या गगनभेदी घोषणा विरल्या आणि आता *घोषणा देणे कमीपणाचे* वाटू लागले.अरे बघता काय सामील व्हा / ताई माई अक्का विचार करा पक्का …. ह्या घोषणा २००२ नंतर फारश्या ऐकूच आल्या नाहीत. *हे फक्त आधुनिक तंत्रज्ञान,सोशल मीडिया,टीव्ही चॅनल मुळे घडले असे मानने भोळेपणाचे ठरेल. सगळे कमर्शियल झाले*,झटपट यश मिळविण्यासाठी कष्ट करायची सवय गेली आणि *राजकारणातील अर्थकारण* वेगाने वाढले त्याचे हे दुष्परिणाम आहेत असे मला वाटते.घरोघरी जाऊन स्लिपा वाटायच्या असतात हे आता फक्त बैठकीत मार्गदर्शनापुरते.मग छापील स्लिपा आणि टॅब वर लोड केलेली मतदार यादी घेऊन घरोघरी जाणारे पेड कार्यकर्ते (?)ही आत्ताच्या निवडणुकीची ओळख बनली आहे.येथे आता असण्यापेक्षा दिसण्यावर भर आहे (चमकोगिरी चरम वर ) *मनी,मसल पॉवर ,माणसे जमविण्याची क्षमता आणि जात* महत्त्वाची झाली आहे.
अश्या राजकारणाच्या दूषित वातावरणात ही भाजप सारख्या केडर बेस पार्टी मधे अजुन ही याद्या फोडणारे – अरे ते शिंपी आळीतले कुंभार कुठे राहायला गेले ,तो पत्र्या मारुती पासचा कुलकर्णी आता डहाणूकर ला राहतो कुणी तरी उद्या जाऊन या त्याच्याकडे ,अशी आरोळी ठोकणारे आणि अजूनही *भेळभत्ता वर ताव मारणारे कार्यकर्ते* बघितले की सगळेच काही संपले नाही याची जाणीव होते आणि नव्या उमेदीने पुनश्च प्रचाराच्या रणधुमाळीत उतरायला सज्ज होतो.परंपरागत प्रचार यंत्रणाच कामाची आहे ,वैयक्तिक संपर्क हाच राजकारणाचा पाया आहे आणि तो भक्कम करणे गरजेचे आहे हे पटते.
अजून एक महत्त्वाचे म्हणजे आता नेते ही Professional झाले आहेत,हलक्या कानाचे आणि ठराविक चमच्यांपुरते … पूर्वी प्रमाणे *कार्यकर्त्यांच्या सुख दु:खात* सहभागी होणारे ,आपलेपणा वाटावा असे नेते दुर्मिळ झाले आहेत .ताण तणावामुळे *कार्यकर्त्यांशी तुसडेपणे वागणारे* ,मूड प्रमाणे वागणारे नेते जास्त झालेत. आता अश्या नेत्यांना ही केवळ त्यांच्या कडे असलेल्या *सत्तेच्या पदामुळे* लोक थोडा भाव देतात / पूर्वी च्या सारखे *प्रेम आणि आदर* खचितच उरलेला नाही . त्यातून जिथे *वाकावे तिथे मातीचे पाय आणि अत्यंत हलक्या कानाचे नेते* …. यामुळेच मनी आणि मसल पावर असलेल्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले आणि सर्व पक्षांचा पाया असणारे *सच्चे कार्यकर्ते* मागे पडले .
एक आठवण महत्त्वाची आहे . पुणे मनपा च्या २००२ च्या निवडणुकीमध्ये मला *प्रवक्ता* अशी जबाबदारी देण्यात आली होती तसेच पक्ष कार्यालयातील अन्य जबाबदाऱ्या ही होत्याच . प्रदेशाकडून प्रचार साहित्य आले होते ,त्याचे गठ्ठे करुन सर्व उमेदवारांना ते घेऊन जाण्यासाठी फोन करत होतो . पक्षात नव्यानेच दाखल होवुन तिकीट मिळालेल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना फोन केला असता ” तुम्ही माझ्या ऑफिस जवळच राहता ना ,मग घरी जाताना देउन जा ना ऑफिसवर ” आणि माझा त्यांचा फारसा परिचय नसताना ही पक्षकार्य म्हणून मी घरी येताना त्यांचे साहित्य माझ्या स्कूटर वरुन पोच केले . हा प्रसंग येवढ्यासाठीच सांगितला की तेव्हा कार्यकर्ता जमीनीवर होता आणि निष्ठेने पक्षकार्य करत असे . आज *कोणास असे साहित्य पोहोचविण्यास* सांगितले तर त्याला त्यात कमीपणा वाटतो .
अर्थात ३५ वर्षात बदलले नाही ते म्हणजे – *खुशमस्करे* – ही एक *वेगळीच जमात* असते , हे *काम काहीच करत नाहीत* ,फक्त *रिपोर्टींग करणे ,नेत्यांच्या कानाला लागणे* त्यांच्या फेऱ्यांतून किंवा सभा / बैठकीत स्थानिकांना डावलून *चमकोगिरी* करणे आणि एसी त बसून आल्यागेलेल्यांवर डाफरणे. पूर्वी लिंबु सरबत किंवा कुल्फी खाणारे खुशमस्करे आता प्रगतीपथावर असून मस्तानी आणि बिर्याणी वर ताव मारतात…..आणि गंमतीचा भाग असा की काहीही न करणारे हे नेत्यांना जास्त प्रिय असतात लाडके असतात आणि उन्हात घरोघरी जाउन पत्रक वाटणारा कार्यकर्ता दोडका …. कार्यकर्त्याने ही हे ओळखले असल्याने तो ही आता तोंडदेखले काम करतो….Accountability राहिली नाही आणि आपले कोणी काही वाकडे करु शकत नाही ही भावना बळकट झाली…….
*हे असे बदलले आहे निवडणूकीचे तंत्र आणि मंत्र* …
*संदीप खर्डेकर*
मो – ९८५०९९९९९५
(लेखक हे भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते असून भाजपच्या शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी आहेत .ज्यांचा गेली ३५ वर्षाहून अधिक काळ आंदोलने, माध्यमे,शासकीय प्रशासन व्यवस्था आणि नागरिकांच्या कथा आणि व्यथांशी सातत्याने संपर्क राहिला आहे. )