“अंकल, वो जरा फ्रेंडशिप रिबन देना और बँड भी चाहिये और वो हाथ पर लिखने के लिये मार्कर भी चाहिये।” दुकानात आलेल्या मुलांच्या घोळक्याने त्या दुकानदाराला नुसते भंडावून सोडले होते. ” सकाळपासून सगळे पोरे लोक फ्रेंडशिप रिबनच्या मागे पडले हाय, अशी काय फ्रेंडशिप होते काय??” दुकानदाराच्या या प्रश्नाने मलाही निरुत्तरच केले.
ऑगस्टचा पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून सगळीकडे साजरी केला जातो. तरुणाई मध्ये हा दिवस तर भलताच फेमस आहे. अगदी मैत्रीचे ते गोडवे तरी किती गायचे याला सीमाच नसते. फ्रेंडशिप बँड, हॅप्पी फ्रेंडशिप डे लिहिलेली रिबन आणि काय काय अगदी सगळ्यांच्या हातात ती बांधलेली असते. एवढंच पुरेसं नसतं म्हणून की काय हातावर, चेहऱ्यावर, पाठीवर किंवा शरीरभरच म्हणायला काही हरकत नाही, मार्कर पेनने आपल्या मित्रमंडळींची नावंही लिहिली असतात. अशा प्रकारे तो किंवा ती रंगले असले तर ते खूपच भारी असतं बुवा, म्हणजे त्याला किंवा तिला किती फ्रेंड्स आहेत याचे गोडवे गायले जातात. त्याची फोटोसकट पोस्ट फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप सगळीकडे फिरतच असते. खरंच अशा प्रकारे मैत्रीचा देखावा केलेली मैत्री असते का खरी…? जिवाभावाचे मित्र – मैत्रिणी याचं मर्म खऱ्या अर्थाने किती जणांना उमगलं असेल, हा मोठा प्रश्नच आहे.
फेसबुकवर माझी फ्रेंड लिस्ट जास्त की तुझी जास्त, अशीही चढाओढ सुरू असते. आणि त्यात अभिमानही असतो…अरे माझे कित्ती फ्रेंड्स आहेत! आली फ्रेंड रिक्वेस्ट की कर एक्सेप्ट. मग तो मित्र किंवा मैत्रीण कोण आहे, काय करतो, त्याचं प्रोफाइल काय हे बघण्याची बरेच जण तसदी घेत नाहीत. आणि नसत्या प्रलोभनाला काही जण बळी पडतातही. फेसबुकवर आधी मैत्री केली, सगळी माहिती काढली आणि मग फसवणुकीच्या काही घटनाही घडतात. सगळ्यांचाच बाबतीत असं घडतं असं नाही…काही मैत्रीचे धागेही जुळतात. माझी आणि तनूची (तनुजा इनामदार) मैत्री फेसबुकवरच जुळलेली. खूप वर्षांनी काही मित्रमैत्रिणीही फेसबुकमुळे एकमेकांना पुन्हा जोडले गेलेत. शाळेतील आम्ही मित्रमैत्रिणीही या फेसबुकच्या आणि व्हाट्सअपच्या मुळेच पुन्हा एकत्र आलो. १९८० सालानंतर सर्वजण भेटलो ते थेट २०११ साली…तेही ऑगस्ट महिन्यात. मैत्रीच्या धाग्यात गुंफत राहिलो. सुखदुःखात एकमेकांना साथ करत.
खरंच मैत्री हे नातं खूप सुंदर आणि निर्मळ आहे. एका अंतर्मनाने घातलेली साद जेव्हा दुसऱ्या अंतर्मनाला कळते, तेव्हा खऱ्या अर्थाने मैत्री रुजते. चित्रपटसृष्टीने या मैत्रीचे गोडवे नेहमीच गायले आहेत. अगदी ‘दोस्ती’ पासून ते याराना, दोस्ताना, दिल चाहता है, थ्री इडियट्स… ‘शोले’मधील लोकप्रिय जय-वीरूची म्हणजेच अमिताभ आणि धर्मेंदची जोडी, १५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या लोकप्रियतेचे गारुड आजही जनमानसावर कायम आहे. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ म्हणणारे जय – वीरू खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत दोस्ती निभावतात. मैत्री अशी असली पाहिजे यार…जीवाभावाची… मैत्रीचा खरा अर्थ समजून उमजून साजरा करूया – ‘ये बंधन दोस्ती का’ म्हणत एकमेकांना मैत्रीच्या धाग्यात बांधणारा फ्रेंडशिप डे !
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068