पुणे-राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून, येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवर नेत्यांचा कानोसा घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अध्यक्ष शरद पवार उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतील असे बोलले जाते . मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार यांना येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. मात्र अशा राजकीय चर्चा घडवून आणल्या जातात. गेल्या निवडणुकीतही शरद पवार शिरूर व इतर मतदारसंघातून चाचपणी करीत असल्याच्या चर्चा मध्यमातून केल्या जात होत्या. अनुकूल वातावरण तयार करणे व पक्षांतर्गत गट-तट प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
महाराष्ट्रात व्यक्तीनिष्ठ आधारित प्रमुख राष्ट्रवादी व शिवसेना हे २ राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे शरद पवार, खासदार कन्या सुप्रिया सुळे, आमदार पुतण्या अजित पवार या पवार कुटुंबातील व्यक्तिंकडेच आहे. आता तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तिसर्या पिढीतील दोन युवक राजकारणात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या या दोघांवरच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पार्थ अजित पवार आणि रोहित राजेंद्र पवार हे दोन युवक आहेत. पार्थ हे अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. तर रोहित हे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब यांचे नातू आहेत. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत; तर पार्थ पवार हे उद्योजक आहेत. त्यांचे परदेशात व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण झाले आहे. पार्थ दादा पवार युवा मंच महाराष्ट्रच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांनी त्याचे मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभाग घेऊन पदयात्रा काढली. या निमिताने राजकारणात सक्रीय झाल्याचेसमोर आले होते. पार्थ पवार अनेक दिवसांपासून शरद पवारांसोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांचे सासरे हडपसर मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. पक्षातील काही पदाधिकारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. अशी चर्चा पक्षात आहे. अजित पवार यांनी मी बारामती मतदारसंघाशिवाय इतर कोणत्याही मतदारसंघात उभा राहणार नाही, अशी घोषणा दोन महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका जाहीर सभेत बोलताना केली होती; त्यामुळे रोहित पवार यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो, असे सूतोवाच अजित पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. ‘आताची पिढी मोठी झाली असून, त्यांचे निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत. राजकारणात काम करताना स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जाते. माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, असे मी मध्यंतरी म्हणालो होतो, परंतु जग आता बदलत आहे. मी कोणावर निर्णय लादणार नाही, कुणी आपल्या करियरचा निर्णय घेत असेल तर मी रोखू शकत नाही,” असे सांगत अजित पवार यांनी पार्थच्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले. मावळ लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले राहुल नार्वेकर लढले होते; परंतु ते तिसर्या क्रमांकावर राहिले होते. या वेळी लोकसभा निवडणूक निकराने लढवायचा निर्धार राष्ट्रवादीने केला असल्याने पार्थ पवार यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय होऊ शकतो. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या शहरावर स्वतः अजितदादा पवार यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. परंतु, २०१४ पासून अजितदादांच्या पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे. हे सर्व पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे झाले. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवडचा परिसर येतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या परिसराचे अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 पर्यंत शहराचा भाग बारामती लोकसभा मतदार संघात येत होता. त्यानंतर पुर्नरचना झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली आहे. 2009 मध्ये शिवसेनेकडून गजानन बाबर आणि 2014 मध्ये श्रीरंग बारणे निवडून आले आहेत.मावळ हा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांत विभागला गेला आहे. पुण्यातील चिंचवड, मावळ आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदारसंघ यात येतात. येथे राष्ट्रवादीची ताकद २०१४ पैकी मोठ्या प्रमाणात होती. तरीही २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत येथे पक्षाला विजय मिळाला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवड, पनवेल या दोन मोठ्या महापालिकांसह लोणावळा, तळेगावदाभाडे या नगरपालिका आणि ग्रामपंचायती भाजपने काबिज केलेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची राजकीय स्थिती भक्कम आहे. तरीही भाजपची सर्व मदार पिंपरी-चिंचवड शहरावर असणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे निवडणुकीच्या मैदानात असतील अशी चर्चा आहे तर राष्ट्रवादीचे शहारध्यक्ष संजोग वाघेरे यांचे एकमेव नाव मावळच्या मतदारसंघात चर्चेत आहे. या मतदारसंघात भाजपखालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्ररचना झाली. या पुनर्रचनेनुसार २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पुनर्ररचनेत मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडपासून ते रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तारला आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ येतात. २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका भाजप व शिवसेनेने एकत्र लढविल्या. या दोन्ही निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. दोन्ही वेळेस या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. पिंपरी चिंचवड तत्कालीन शहराध्यक्ष योगेश बेहल यांनीच दादांचे निर्णय चुकले असं सांगत दादांना घराचा आहेर दिला होता. आगामी निवडणुकीत स्वतः अजितदादांचे पुत्र मैदानात उतरल्यास राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने पक्षाचेच काम करतीलच असे नाही. दुसरीकडे या मतदारसंघात भाजप प्रथम क्रमांकावर असल्याने अजितदादांचे पुत्र मैदानात आल्यास विजयासाठी झुंजावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.