पुणे–काय झाले कोणास ठाऊक, पिंपरी चिंचवड च्या राजकारणातील ‘टायगर’म्हणून ओळख असणाऱ्या आ. लक्ष्मण जगताप यांचे कशामुळे धाबे दणाणले ,याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे ,त्याला कारण हि तसेच घडले आहे , शेवट पर्यंत भाजपमध्येच राहील ‘ असे स्पष्टीकरण ते करू लागले आहेत . यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली ,’ काय झाले ,कशामुळे दणाणले धाबे ?’ असा सवाल होऊ लागला आहे .अंदर तो अपनी मार्जीसे आवोगे ,मगर जावोगे ..नही.. या फिल्मी डॉयलॉगचा देखील आता जगताप यांच्या स्थितीमुळे चर्चेत उल्लेख होवू लागला आहे .
आमदार जगताप पुन्हा राष्ट्रवादीत जाऊन मावळातून निवडणूक लढविणार – अशा वृत्तानंतर त्यांच्यावर याबाबत प्रसिध्दीपत्रककाढण्याची वेळ आली आहे. या पत्रकात नमूद केले आहे की, मी यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. भाजपामध्येच राहून भाजपासाठीच शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे. माझ्या या पुढच्या सर्व निवडणुकाही मी भाजपातर्फेच लढणार आहे. त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेतूनच माझ्या विरोधात अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. माझ्या विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच ‘उद्योग’ आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहीत झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मी भाजपामध्ये शेवटपर्यंत राहणार असून यापुढच्याही सर्व निवडणुका भाजपातर्फेच लढविणार असल्याचे आमदार जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
राष्ट्रवादीकडून नगरसेवक स्थायी समीतिचा अध्यक्ष ,महापौर ,आमदार अशी पदे भूषवून सध्या भाजपसारख्या पक्षात जाऊन त्यांनी आपल्या पूर्वीच्याच नेत्यांना गेल्या निवडणुकीत शह दिला असला तरी ,’ आता मात्र त्यांनी पुन्हा पुन्हा कोणालाही शह द्यावा ,अशी स्थिती उरली नसावी म्हणून त्यांच्यावर असे पत्रक काढण्याची वेळ आली असावी असे भाजप मधील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड मधील राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन
– चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळमधून लढविण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे.
– शिवसेनेशी युती झाल्यास विद्यमान खासदार म्हणून सेनेकडे मावळ लोकसभा कायम राहील.
– मावळ लोकसभा मतदारसंघात आमदारांचे संख्याबळही भाजपचे मित्रपक्षापेक्षा मावळमध्ये अधिक आहे. पिंपरी-चिंचवडसह पनवेल या मतदारसंघातील महापालिका व वडगाव मावळ आणि लोणावळा नगरपरिषद पक्षाच्या ताब्यात आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या मावळवर भाजपचा दावा युती होण्याच्या दृष्टीकोनातून टिकणारा नाही.
– भाजप-सेना युती झाल्यास सेनला मतदारसंघ गेल्यावर मावळमधून भाजपकडून लढविण्याची इच्छा आमदार लक्ष्मण जगताप यांना सोडून द्यावी लागेल.
– गेली 14 वर्षे आमदार असलेले लक्ष्मण जगताप मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील त्यांची पहिलीच टर्म आहे. जिल्ह्यातून मावळ विधानसभेचे आमदार भेगडे भाजपमधून सलग ३ वेळा निवडून आलेले आहेत. भेगडे देखील मंत्रिपदाचे हक्कदार आहेत. तर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यांच्या जवळचे मानले जातात, पालिकेतील महापौरपदी समर्थकांची निवड करून वर्चस्व सिद्ध केलेले असून ते देखील महामंडळ अथवा मंत्रिपदाचे दावेदार आहेत.
– आमदार लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या समर्थकांना पालिकेतील प्रमुखपदी/महापौरपदी नियुक्ती करता आलेली नाही.
– मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत त्यांचा समावेश होत नाही.
– आझम पानसरे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले पण त्या पुढे त्यांना राजकीय दृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही. महापालिका विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना ही आझम पानसरे यांच्यावर भाजाप मध्ये ही अन्याय होतो आहे ही भावना समर्थकांमध्ये आहे. आझम पानसरे देखील चांगल्या पदाचे आशावादी आहेत. त्यांना भाजपामध्ये सामावून घेण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनाही काहीही देता आले नाही याचे देखील शल्य राहणारच.
– २०१४ निवडणुकपूर्व भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार मंत्रिमंडळ प्रतिक्षेत आहेत तसेच यांना महामंडळही दिलेले नाही-
डॉ. अनिल बोंडे, डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र पाटणी, किसन कथोरे, डॉ. सुनील देशमुख, स्रेहलता कोल्हे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, प्रकाश भारसाकळे, अमल महाडिक, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रशांत ठाकूर, संजय सावकारे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हे भाजपात बाहेरून आलेले आमदार आहेत. यापैकी देशमुख व ठाकूर वगळता कुणालाही मंत्रीपद वा साधे महामंडळदेखील मिळालेले नाही.
– राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. साधारणत: नऊ नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील. त्यात बाहेरून आलेल्यांपैकी किमान दोघांना तरी संधी दिली पाहिजे अशी मागणी आहे तरी देखील भाजपच्या मंत्रिपद निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत आमदार लक्ष्मण जगताप व अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा समावेश होत नाही.
– कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा आमदार लक्ष्मण जगताप यांचा खुलासा
– वरील सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कोणतेही मंत्रिपद व साधे महामंडळदेखील मिळणार नाही, समर्थकांची महत्वाच्या पदावर निवड करून घेता येत नाही, जागा वाटपात भाजपला मावळ लोकसभा मिळाला नाही तर खासदारकी लढविण्याची इच्छा पूर्ती करता येणार नाही, लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार सोडून द्यावा लागेल. महापालिकेतील एक हाती सत्ता केंद्र नाहीं, या सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक आहे असे काही जाणकारांचे मत आहे.