माझे मित्र श्री जयराज यांना डाँकटरांनी बायपास करण्याचा सल्ला दिला आणि ते हादरलेच. काय करायचे म्हणून जयराम यांनी मला फोन केला. दुसऱ्या तज्ञाचे मत घ्यावे असे मी सुचविल्यावर ते म्हणाले, तुम्हीच सांगा, कुणाकडे जायचे म्हणून. अशा जीवघेण्या परिस्थितीत तातडीने योग्य सल्ला मिळणे फार आवश्यक असते म्हणून मी तात्काळ हृदयरोगतज्ञ डाँ.रोहिदास वाघमारे सर यांना फोन केला. त्यांनी लगेच भेटीची वेळ दिली.
ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी आधी कुठलेही रिपोर्ट्स न पाहता केवळ नाडी परीक्षा करून निदान केले. सध्या कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची गरज नसून योग्य आहार,नियमित व्यायाम,सकारात्मक विचार करणे असे सोपे उपाय त्यांनी हसत हसत सुचविले. निघताना जयराम यांनी फी देण्यासाठी पैश्याचे पाकीट उघडले . तर आम्हाला आश्चर्य आणि आनंदाचा धक्काच बसला. कारण ते म्हणाले, अहो, मी कोणाकडून, कधीही फी घेत नाही , तर तुमच्या कडून कशी घेऊ ? मी जर फी घ्यायचे ठरविले तर रोज ५० हजार कमावू शकतो. पण ते माझे ध्येय नसून लोकसेवा हेच माझे खरे ध्येय आहे. खरोखरच आजच्या जगात असे ध्येयवादी डाँकटर आहेत हे पाहून आम्ही भारावूनच गेलो. वाघमारे सर बसले होते,त्यांच्या मागच्या, पुढच्या,शेजारच्या भिंतीवर अनेक सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्रं दिसत होती. ही सर्व त्यांच्या आजपर्यंतच्या निस्वार्थ सेवेची पावतीच म्हटली पाहिजे. आज जरी ते मानसन्मानाच्या शिखरावर असले तरी इथपर्यँतची त्यांची वाटचाल अजिबात सोपी नाही.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका गरीब,निरक्षर पण संस्कारक्षम चर्मकार कुटुंबात त्यांचा ८ जून १९५४ रोजी जन्म झाला. आठव्या इयत्तेपर्यंत ते १० पैश्याला बुटपालिश करत शिकले . इतकेच नव्हे तर अस्पृश्यतेचे चटके सहन करत गुणवत्तेत येत राहिले. शिक्षणाबरोबरच त्यांनी चित्रकला, हस्तकला, नाट्य, क्रीडा, वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले होते. १९७६ साली औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला त्यांना प्रवेश मिळाला .ते सम्पूर्ण मराठवाडा विभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम आले होते.नंतर त्यांनी एम डी ( मेडिसिन) ही पदवीही प्राप्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध उच्च पदांवर कार्य करून ते ३० जून २०१२ रोजी सेवानिवृत्त झाले. वैद्यकीय सेवेबरोबरच ते सातत्याने साहित्यसेवा, नाट्य,चित्रपट, समाजसेवा, शैक्षणिक सेवा करत आले आहेत. आजवर ५००हुन अधिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, उद्घाटक, परीक्षक म्हणून उपस्थित राहिले आहेत. विविध वृत्त वाहिन्यांच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. विविध साहित्य संमेलनामध्ये ते अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. त्यांचे ४ कविता संग्रह, एक वैद्यकीय पुस्तक पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांनी मराठी,हिंदी वृत्तपत्रातून नियमितपणे आरोग्य विषयक लेखन केले आहे. आजपर्यंत त्यांना दीडशेहून अधिक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. जगनमित्र असलेल्या, इतरांना आरोग्य, आनंद प्रदान करणाऱ्या डाँ. रोहिदास वाघमारे यांना दीर्घायुष्य लाभो आणि या पुढचीही त्यांची वाटचाल दैदीप्यमान राहो,या मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी.