पुणे-राज्यातील जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी शासनाची योजना तयार असून ती अंतिम टप्यात आहे. लवकरच त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिली. पत्रकार दिनानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जेष्ठ पत्रकारांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बापट बोलत होते, आमदार राहूल नार्वेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे , कार्यवाह विठ्ठल जाधव, सरचिटणीस दिगंबर दराडे, आमदार व्यासपीठावर उपस्थित होते, पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शंभरहून अधिक जेष्ठ पत्रकार या समारंभाला उपस्थित होते. बापट म्हणाले ” पत्रकारितेच्या व्यवसायात आर्थिक अस्थिरता असल्यामुळे जनजागरणाचे काम करणाऱ्या पत्रकारांना उतारवयात अडचण सोसावी लागते, ही बाब अलीकडे प्रकर्षाने जाणवत आहे, म्हणून राज्यातील ठिकठिकाणच्या पत्रकार संघटनांना विश्वासात घेऊन निवृत्ती वेतन योजना कार्यान्वित करण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर चालू आहेत. १८ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भातील बैठक होत आहे. पत्रकारांना पेन्शन मिळावी, यासाठी मी व्यक्तिश: प्रयत्नशील आहे,
आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर यांना अभिवादन करून बापट म्हणाले की बाळशास्री हे भाषाप्रभू होते, संस्कृत, बंगाली, गुजराती, कन्नडी, तेलगु, फारसी, फ्रेंच, लॅटिन, अशा किती तरी भाषांवर प्रभुत्व होते, याची दाखल घेऊन फ्रान्सच्या राज्याने त्यांचा सत्कार केला होता, त्यांनी निष्ठेने उभी केलेली पत्रकारिता आज शिल्लक आहे का? याबद्दल मला शंका आहे, पत्रकारितेत आता पेड न्यूजचा जमाना सुरु झाला आहे. त्यामुळे विश्वासार्हता कशी टिकवायची ? याचे या व्यवसायासमोर आव्हान उभे आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम पत्रकार करीत असतात. त्यांच्याबद्दल समाजानेही सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, जेष्ठांनी त्यांचे अनुभव पुस्तकरूपाने पुढच्या पिढीला द्यावेत, पत्रकार संघाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे. यावेळी मा. कृ. पारधी, एस. के. कुलकर्णी, चंद्रकांत दीक्षित, व.र.देशपांडे , सुभाष नाईक, हरीश केंची, हॅरी डेव्हिड, वाय. व्ही. कृष्णमुर्ती, जयराम देसाई ,किरण डोणगावकर,अनंत दीक्षित, आल्हाद गोडबोले, आदि पत्रकारांचा बापट यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला, डॉ. किरण ठाकूर, राजू साबडे , अरुण खोरे, विनायक तांबेकर, अनंत बेदरकर, गोपाळ साक्रीकर, चंद्रशेखर कारखानीस, प्रवीण वाळिंबे, नंदकुमार काकिर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. विकास वाळुंजकर यांनी सुत्रसंचालन केले, शैलेश काळे यांनी प्रास्ताविक केले, महेंद्र बडदे यांनी आभार मानले.