पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त मी निवडणूक लढवणार आहे. अजित, रोहित आणि पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना युतीवर आश्चर्य वाटत नाही. युती राज्यात ४८ तर देशात ५४७ जागा जिंकेल, असा शरद शरद पवार यांनी लगावला. ते पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.
आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. युतीवर आश्चर्य वाटत नाही. गेल्या २ महिन्यांपासून मी नेहमी हेच सांगत आहे. युती करण्याचा निर्धार दोघांचा आहे. सेनेने संसार करण्यापूर्वी जेवढ्या दुगण्या झाडायच्या त्या झाडल्या आणि आता संसाराला लागली.
ते पुढे म्हणाले, की युती राज्यात ४५ नाही तर ४८ जागा जिंकेल. तसेच देशात ५४७ जागा जिंकेल, असे भाजपने म्हणायला हवे ते चुकले. या ४८ मध्ये बारामती मतदारसंघ पण येतो. सत्तेची गादी आणि ऊब सोडायची तयारी नव्हती. ऊब सोडायची वेळ आल्यावर पुन्हा ते गादीवर बसले. युतीने आघाडीचे काम सोपे झाले, तर ईडीचा दबाव होता यावर काही माहिती नाही.
पुलवामा येथे देशावर हल्ला झाला. त्याच्या दुसर्या दिवशी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. आम्ही राष्ट्रीय प्रश्न असल्याने बैठकीला गेलो, मात्र पंतप्रधानच गैरहजर होते. राष्ट्रीय आघात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना धुळे आणि यवतमाळला आमच्यावर दुगण्या झाडणे महत्त्वाचे वाटले. या बैठकीला सर्वपक्षीय नेते होते, मात्र भाजपचा एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. गृहमंत्री उपस्थित होते. दोन्ही देशांनी युद्धाची परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही. लष्कराने भारतीय महिलांना अपील केले आहे. मात्र, याचा पाकिस्तान फायदा घेईल? असाही धोका पवार यांनी बोलून दाखवला.