पुणे: ‘गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,’ असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
रविवारी सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भाजप प्रवेश पार पडला. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार 15 वर्ष सत्तेत असताना तुम्हा महाराष्ट्रासाठी काय केलं? असा सवाल अमित शाह यांनी विचारला होता. यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अमित शहांचा समाचार घेतला.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात…
साहेबांचं राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवावं असं निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते IT पार्क उभा करण्यापर्यन्तची हि शृंखला आहे.
महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.
सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया. एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपणा तरुणांनाच पुढे घेवून जावी लागणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.