मुंबई-निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे 60% नियमबाह्य पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. यावर आता शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणावर बोलताना शरद पवार म्हणाले, “जे करायचे ते करावे, पण भान ठेवले पाहिजे. या प्रश्नात पडू नये, वाद वाढवू नये. ज्यावेळी संबंध महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, अशा वेळी अशा प्रश्नाच्या बाबतीत सर्वांनी अत्यंत समंजसपणे बोलण्याची गरज आहे.”
पवार पुढे म्हणाले की, “मला काही दुसरी फारशी चिंता यात वाटत नाहीये. राजकारण करावे पण कुठे आणि कधी याचे तारतम्य ठेवायला हवे. या मुद्यावरून तालुक्या-तालुक्यात दुरावा निर्माण होऊ नये, ही काळजी घ्यायला हवी. ही काळजी माझ्याकडून घेतली जाईल.”
काय आहे प्रकरण ?
निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे 60% नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. यानंतर बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन दिवसांत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यासंदर्भात लेखी आदेश काढणार असल्याचे बोलले जात आहे.शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला होता. यामध्ये नीरा देवघर धरणातून 60% पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला तसेच 40% पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतच करण्यात आला होता, आता हा कार्यकाळ संपला आहे. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. पण आता बारामतीला दिले जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिले आहेत.