पुणे-अजून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी,आघाडी नंतर काल झालेल्या सेना भाजप युतीच्या घोषणेनंतर लोकसभेचे बिगुल खऱ्या अर्थाने वाजले आहेत .खरे तर पुण्याच्या लोकसभेचे बिगुल , ज्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हटले गेले किंवा म्हटले जाते ,त्या खासदार संजय काकडे यांनी आपली उमेदवारी ,आपणच जाहीर केली तेव्हाच वाजले . अन सुरु झाली, लढत ..नव्या राजकीय पर्वाची ,आणि अनुभवी ,मुरब्बी ,ज्येष्ठ अशा पालकमंत्री असलेल्या गिरीश बापटांच्या अस्तित्वाची ..आता कोण लोकसभेला लढणार ,कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार ? असे प्रश्न अजून अनुत्तरीत असले तरी ,कॉंग्रेस कडून संजय काकडे लढतील आणि भाजपकडून गिरीश बापट लढतील असे कयास व्यक्त करणारेच मोठ्या संख्येने दिसत आहेत .आणि हेच कयास मान्य केले तर .. हि लढाई ..उदय आणि अस्ताची च असेल यात शंका नाही .
पुण्याच्या लोकसभे साठी कॉंग्रेस कडून मोहन जोशी ,अभय छाजेड हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेतच . पण काकडे यांनी गेली काही महिने सुरु केलेला भेटीगाठींचा धुराळा काही खाली बसायला तयार नाही .तो उंच उंच वावटळी सारखा फोफावतो च आहे. अगदी माजी नगरसेवकापासून ..मग तो कोणत्याही पक्षाचा असेनात ..त्या पासून ते शरद पवार ,अजित पवार ,रामदास आठवले ,छगन भुजबळ, सुरेश कलमाडी ,शशिकांत सुतार अशा विविध पक्षांमधील विविध स्तरातील मान्यवरांच्यासह त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील भेट घेतली . मध्यंतरी त्यांनी लष्कर परिसरातील लोकप्रतिनिधींना घेऊन दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही भेटी गाठी घेतल्या . पण सर्वात महत्वाच्या होत्या त्या त्यांच्या शहराच्या काना कोपऱ्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी …मराठा समाज ,मुस्लीम समाज अशा विविध समाजाच्या संघटना ,गणपती मंडळे त्यांनी सोडली नाहीत .थोडक्यात वेगवेगळ्या भागात प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन ,व्यापारी आणि सामजिक प्रतिनिधींच्या कडे जाऊन त्यांच्या सुरूच असलेल्या भेटी अन्य दिवशी सकाळी बंगल्यावर आणि दुपारी ऑफिसवर त्यांच्याकडे सुरूच असलेला भेटीचा ओघ .. पाहता … उद्योग क्षेत्रात घेतलेल्या भरारी नंतर त्यांनी आता नव्या राजकीय पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात केल्याचे म्हणावे लागेल .भाजप सह शिवसेना,आरपीआय ,कॉंग्रेस ,राष्ट्रवादी अशा विविध पक्षांमधील त्यांचा संपर्क बरेच काही सांगून जाणारा आहे .
या उलट भाजप ची ज्यांच्यावर मदार आहे , ते पालकमंत्री गिरीश बापट मात्र मंत्री पदाच्या वलयातून बाहेर पडल्याचे अद्याप दिसत नाही . पुण्याच्या अनेक प्रश्नावर त्यांनी अधिकारी ,लोकप्रतिनिधी यांच्या बैठका मात्र जरूर घेतल्या पण त्यातून ठोस काही ना पक्षाच्या हाती लागले ना कार्यकर्त्यांच्या ….नगरसेवक ते मंत्री पदापर्यंत चा त्यांचा आयुष्यभराचा प्रवास …आणि राजकीय शिदोरी मोठी असली तरी काकडे यांनी गेल्या ३ महिन्यात संपर्काचा उडविलेला धुराळा बापटांनी कधी उडविलाय असे मानायला कोणी तयार नाही .
एकीकडे भाजपचे सहयोगी असलेल्या काकडे यांनी जसजशी पुण्याच्या राजकारणात आपल्या राजकीय पर्वाची सुरुवात करण्याचे संकेत दिले, तसं तसे ते भाजप कडून दुखावले गेले आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सानिध्यात रमत चालले . असे असले तरी अजूनही भाजपच्या नगरसेवकांची मोठी मोट त्यांच्या गाठी आहे .अमोल बालवडकर ,विजय शेवाळे यांच्या सारखे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच काय ते बापटांच्या गळाला लागले.
सातत्याने कसबा विधानसभेतून विजय मिळविलेले बापट यांच्या हाती विधानसभेतील सत्ता काल तसा फार काही लाभला नाहीच .ना नवे काही देण्याची ,निर्माण करण्याची संधी त्यांना लाभली. पर्यायाने आपल्या मूठभर समर्थकातच त्यांनी आपले राजकारण व्यतीत केले .
म्हणजेच आता बापट विरुद्ध काकडे अशी लढत झालीच तर नव्या राजकीय पर्वाचा उदय होईल कि सातत्याने कसब्यावर आणि त्या माध्यमातून पक्षावर आपला वरदहस्त ठेवत आलेल्या ज्येष्ठ ,अभ्यासू अशा बापटांनाच विजय मिळेल यावर कार्यकत्यांमध्ये आताच उत्सुकता दिसून येते आहे .