मुंबई-लोकसभेच्या मतमोजणी नंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. याबाबत चर्चाही राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पुढल्या महिन्यात 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, या संदर्भातील सर्व निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.
राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?
विशेष बाब म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्तावाची बाब म्हणजे या तिनही नेत्यांनी त्यांच्या सध्यांच्या पक्षांचे राजीनामे दिले नाहीत. पण, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या या नेत्यांना भाजप गळाला लावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली आणि त्यानंतर विस्तार झाला होता. मात्र, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशा फक्त चर्चा झाल्या. पण, प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. अखेर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.