बारामती :
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले, तरी या सरकारची अवस्था 1996 सालच्या वाजपेयी यांच्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघे 13 किंवा 15 दिवस टिकेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला. भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू असून, त्यास 21 मे रोजी मूर्त रूप येईल, असेही पवार यांनी सांगितले.
एका मराठी वृत्तवाहिनीने शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांची मंगळवारी प्रथमच संयुक्त मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवार यांनी वरील भाकीत केले. यावेळी घोडेबाजार होणार नाही. कारण, मोदींमुळे सगळे त्रस्त झाले आहेत, असे सांगत पवार म्हणाले, सर्व विरोधी पक्षांना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मायावतींबाबत भाजप अफवा पसरवत आहे. बादल कुटुंबीयांशी माझे चांगले संबंध आहेत.
भाजपच्या 300 जागा जिंकण्याच्या दाव्यावर उपहासात्मक बोलताना पवार म्हणाले, भाजपविरोधात मोठा जनक्षोभ आहे. तरीही भाजप नेते लोकसभेच्या 300 जागा येतील, असे सांगत आहेत. आठ महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही राज्ये हातातून गेली, यातून ट्रेंड काय आहे, ते कळते. असे असताना हे 300-500 जागा येतील असे सांगतात, याला अर्थ नसल्याचेही ते म्हणाले.
विधानसभेत दुसर्या नातवाचेही लाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी दुसरा नातू अर्थात रोहित पवार यांचे लाड पुरवण्याचेही संकेत दिले. आमच्या घरात सगळे निवडणुकीत सहभागी होतात. रोहित शिक्षण, शेतकरी याकडे लक्ष देतात. आमच्या कुटुंबातील सगळे निवडणुकीत जबाबदारी समजून काम करतात.
रोहित पवारांच्या उमेदवारीबाबत अजून पक्षाने विचार केला नाही, पक्ष निर्णय घेईल. मावळमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव दिसत होता, तेव्हा त्या भागातील लोकांनी पार्थचे नाव सुचवले, म्हणून निर्णय झाला. लोक सांगतात रोहितला उमेदवारी द्या, तो कर्जत-जामखेडमध्ये लक्ष घालतो; पण आमचा तेथे सतत पराभव झालेला आहे. तो मतदारसंघ जिंकायला राष्ट्रवादीला जो उपयुक्त उमेदवार वाटतो, तो उमेदवार देऊ, असे पवार म्हणाले. बारामतीची जागा भाजपने जिंकल्यास लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
दुष्काळ दौरा ही विधानसभा निवडणुकांची तयारी नाही, असे स्पष्ट करीत पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात फिरताना जाणवले की, लोकांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत असल्याचेही पवार म्हणाले.
सर्व विरोधकांना एकत्र आणणार : शरद पवार
यंदाचे सरकार त्रिशंकू नसेल, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही. बाकीचे पक्ष एकत्र बसून स्थिर सरकार देतील. लोक शहाणे आहेत, राज्यकर्ते शहाणे आहेत. अटलजींसारखे नेते असताना आणि कुणाचे नेतृत्व न देता आम्ही 2004 ला सरकार स्थापन केले. आम्ही मनमोहन सिंग यांना प्रोजेक्ट केले नव्हते, 10 वर्षे कारभार केला, आताही आम्ही वेगळे लढलो, तरी एकत्र बसून मतमोजणीआधी आम्ही दिल्लीत चर्चा करू. पुढील पाच वर्षे देशाला स्थिर सरकार देण्याची काळजी घेऊ. सर्वांचे एकत्रीकरण करायला हातभार लावण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे पवार यांनी सांगितले.