पुणे, दि. 4 फेब्रुवारी : शरद पवार यांनी 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतील तब्बल 40 वर्षे सत्तेत घालविली. इतकी वर्षे सत्तेत असताना त्यांना शेती मालाला हमीभाव द्यायला आणि मराठ्यांना आरक्षण द्यायला सूचलं नाही. पवारांनी शेती मालाला हमीभाव दिला असता तर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. परंतु, आता विरोधात असताना मात्र मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे पवारांना वाटत आहे. सत्तेत असताना काही केले नाही आणि विरोधात असताना त्याच गोष्टींसाठी टीका करायची हे शरद पवारांनाच जमू शकते. विरोधकाची भूमिका ते उत्तम करीत आहेत. त्यांनी ती कायम बजवावी, अशा शब्दांत भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर हल्ला बोल केला.
औरंगाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातील मोदी सरकारची धोरण फसवे असल्याचे विधान केले. या विधानाचे आपल्याला आश्चर्य वाटले. कारण, ही टीका करणारे शरद पवार गेली 50 वर्षे राजकारणात आहेत. त्यातील तब्बल 40 वर्षे ते सत्तेत राहिले. या दरम्यान, 1985 साली शरद जोशी यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून देशभर आवाज उठविला. तेव्हापासून ते 1999 पर्यंत बहुतांश सर्व काळ काँग्रेसचे सरकारच सरकार सत्तेत होते. शरद पवार या सरकारमध्ये होते. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना स्वामिनाथन आयोग स्थापन केला. 2006 मध्ये शरद पवार केंद्रीय कृृषी मंत्री असतानाच स्वामिनाथन आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला. याचवेळी जर हा अहवाल शरद पवार यांनी मान्य केला असता व त्याची अंमलबजावणी केली असती तर, त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. त्यानंतर 2006 ते 2014 पर्यंत शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते. याकाळात स्वामिनाथन आयोगाचा अहवाल एका कोपऱ्यात धूळ खात पडला होता. तेच शरद पवार आता पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीड पट हमीभाव जाहीर केल्यावर पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्याऐवजी मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे जाहिरपणे सांगत जनतेची दिशाभूल करीत आहेत. हे फक्त शरद पवार यांनाच जमू शकते, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आताच्या बजेटमध्ये जाहीर केलेला हमीभाव लगेचच लागू होणार आहे. दुष्काळ व अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा योजना, शेतमालासाठी एक देश एक मार्केट आदी योजना मोदी सरकारने युद्धपातळीवर राबविल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ नक्की होणार आहे. ही योजना राबविताना काही तांत्रिक अडचणी नक्की आल्या. परंतु, लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले आहे. त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. एकदा का सरकारने योजना जाहीर केली तर ती पूर्ण होत असते हे शरद पवांना माहिती आहे. त्यामुळे कर्जमाफी योजना यशस्वीपणे राबविली जात आहे व खऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ नक्की मिळणार. काँग्रेसच्या काळात त्यांनीही कर्जमाफी केली मात्र खऱ्या व गरजू शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही. शरद पवार हे जाणते राजे आहेत तर, त्यांनी आपल्या दीर्घकालीन सत्तेच्या राजवटीत शेतकऱ्यांना फायदा होतील अशा योजना आखणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी ते केले नाही. त्यामुळे जनतेने त्यांना याच कारणाने विरोधात बसविले आहे. आणि शरद पवार देखील विरोधकाची भूमिका उत्तम करीत आहेत.
मराठा आरक्षणाबद्दल शरद पवार अलिकडच्या काही काळात बोलत आहेत. प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत पवार सत्तेत खूप वर्षे राहिले. तेव्हा ते मराठा आरक्षणाबद्दल एक चकार शब्दही बोलले नाहीत. ही शरद पवार यांची दुटप्पी भूमिका नेहमीच राहिली आहे. हल्ला बोल यात्रा काढून विदर्भ व मराठवाड्यात 10 ते 15 हजार लोक जमवून शरद पवार सत्तेत येण्याचे स्वप्न पाहात आहेत. जनतेला इतकी वर्षे पवारांनी आपल्यासाठी काय केले? हे समजते. जनता आता पवारांच्या शब्दांना भुलणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काँग्रेस राजवटीत झाल्या. त्यांची धोरणेच याला कारणीभूत असताना दहा वर्षे कृषी मंत्री राहिलेले शरद पवार मोदी सरकारचे धोरण फसवे असल्याचे म्हणत आहेत. हे मोठे आश्चर्यच आहे, असे खासदार संजय काकडे यांनी यावेळी सांगितले.