मुंबई: इव्ही एम विषयी संशय निर्माण झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका लढवण्यापासून अलिप्त राहिलेली मनसे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार का, हा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांपासून, विविध राजकीय पक्ष आणि जनतेसाठीही उत्सुकतेचा ठरला होता. अखेर आज पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी मनसे १०० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. या १०० जागांमध्ये प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि काही ग्रामीण मतदारसंघाचा समावेश असेल असे समजते आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आम्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचंही मत जाणून घेतलं. सर्वांनीच निवडणुका लढवण्याच्या बाजूनं कौल दिलाय. आम्ही ही बाब राज ठाकरेंसमोर ठेवू. आम्हाला आशा आहे की ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून योग्य निर्णय घेतील.
दरम्यान सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या राज ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. विधानसभेत पूर्ण ताकदिनिशी उतरण्याकरताच राज यांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता तर, काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही निवडणूक न लढल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि ते पक्षापासून लांब जाऊ शकतात. एक राजकीय पक्ष या नात्यानं निवडणुकीला सामोरं जाऊन लोकांना पर्याय देणं आपलं काम आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर राज यांनी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
राज यांनी नुकतंच ईव्हीएमविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकाच मंचावर आणलं होतं. इव्ही एम वर विश्व्वास नसल्याने राज निवडणुका लढविन्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट दिसत होते.