माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजित कदम, संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी बैठकीस उपस्थित होते. पाटील यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व शक्यतांवर जोरदार चर्चा झडली. आघाडीमध्ये इंदापूर आणि भोरची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्यामुळे आघाडीचा निर्णय घेताना इंदापूरची जागा कोणाला सोडण्यात येणार, याबाबत स्पष्टता असली पाहिजे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. पुरंदरला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सलग दोन वेळा पराभूत झाल्याने ही जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी जगताप यांनी केली. भोरची जागा काँग्रेसचीच असून, ती जागाही आगामी निवडणुकीत काँग्रेसकडेच राहील, याची हमी देण्यात यावी अशीही मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली.
इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, अशी गळ हर्षवर्धन पाटील यांनी राहुल गांधी यांना घातली आहे. गांधी यांच्याशी इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. ही जागा काँग्रेसची होती आणि तेथून काँग्रेसच निवडणूक लढेल, असे आश्वासन गांधी यांनी दिल्याचे पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे इंदापूरच्या जागेबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आता पवारांकडूनही शब्द सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट शब्द दिला नसला, तरी यापुढे भविष्यात इंदापूरमध्ये आघाडीवरून राष्ट्रवादीकडून वक्तव्ये होऊ नयेत, याचा बंदोबस्त पाटील यांनी केल्याची चर्चा आहे.