मुंबई- अखेर शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. महायुतीच्या निर्णयाबाबत एक पत्रक समोर आले असून यात राष्ट्रीय समाज पक्ष(रासप), शिवसंग्राम, भारतीय रिपब्लिकन पक्ष(रिपाइं) आणि रयतक्रांती पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.अनेक चर्चांनंतर अखेर एका संयुक्त पत्रकाद्वारे भाजपा-शिवसेनेसह मित्र पक्षांच्या महायुतीची सोमवारी (दि.३०) घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. आजच ठाकरे घराण्यातील पहिल्या उमेदवाराने म्हणजेच आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
या पत्रकामध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाचा तसेच महायुतीतील रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या जागांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाच्या पारड्यात ३ जागा पडल्या असून यामध्ये पंढरपूर, अक्कलकोट आणि फलटण या जागांचा समावेश असल्याचे सुत्रांकडून कळते. याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पत्रकात म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्र पक्षांचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे, त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहोत.
या महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढवणार इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशिर्वाद प्राप्त करेल हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत, असेही या पत्रकामधून स्पष्ट करण्यात आले आहे.