संघर्षमय जीवन जगत केला राजकारणाचा प्रवास- माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन
पुणे : माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी ८ मुख्यमंत्री पाहिले. अनेक खात्यांवरील विविध पदे भूषविली. मंत्रीपद असो वा नसो सतत काम करीत राहिलो. परंतु माझ्यावर अचानक आरोप झाले आणि तब्बल एक वर्षाच्या काळात माझ्या अनेक चौकश्या झाल्या, तो वाईट काळ मी अनुभविला. यात कोणतेही तथ्य नसल्याने काहीच सापडले नाही. त्यामुळे आता मी पुढील आरोपांची वाट पहात आहे, कारण त्यामध्ये देखील काही आढळणार नाही. जनतेच्या प्रेमापोटी मी राजकारणात जीवंत असून यापुढेही जनतेची सेवा करणार आहे. त्यामुळे मी ज्याप्रमाणे संघर्षमय जीवन जगत राजकारणाचा प्रवास केला, तसा विद्यार्थ्यांनीही जीवनात संघर्ष करायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुलात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एकनाथ खडसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जनता दल (यु) चे मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता तसेच राज्यसभेचे माजी खासदार के.सी.त्यागी, आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. जाधवर करंडक स्पर्धेपासून सुरु झालेल्या विविध उपक्रमांचा समारोप वर्धापनदिनाच्या मुख्य कार्यक्रमाने झाला.
सन्मानसोहळ्यात इन्स्टिटयूट आॅफ सायन्सचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एन.सी.जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुदर्शन न्यूज चॅनलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरुप होते. कार्यक्रमात संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले उडान भाग ३ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. तसेच जाधवर शैक्षणिक संस्था संचलित पिअरसन टेÑनिंग सेंटरचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
एकनाथ खडसे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कार म्हणजे त्या क्षेत्रातून निवृत्ती असे अनेकांना वाटते. मात्र, हा पुरस्कार म्हणजे माझी निवृत्ती नसून नवी सुरुवात आहे. इतरांनी यामाध्यमातून माझ्या चांगल्या कामाचे मूल्यमापन केले असल्याने कष्टाचे फलित झाल्यासारखे वाटते. त्याकाळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने व कष्टाने भाजपाचे सरकार आत्ता सत्तेत आले. आज गोपीनाथ मुंडे असते, तर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली असती.
ते पुढे म्हणाले, राजकारणात चांगल्या प्रवृत्ती व विचार येत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ राजकारण होणार नाही. राजकारणात शब्दावर पक्के न राहणारे अनेक लोक मी अनुभविले आहेत. सध्या हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की, ज्याची धर्मशाळा झाली आहे. बाहेरील देशातून येथे अनेकजण येतात, त्यांना नागरिकत्त्व दिले जाते. तेच लोक आपल्यायेथे बॉम्ब टाकतात. त्यामुळे अशांना देशाबाहेर काढायला हवे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये बल, बुद्धी आणि सद््विचार रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना पुरस्काराने गौरविण्यात येते. जाधवर परिवारात असलेल्या बावीस हजार विद्यार्थी व पालक आणि सातशेपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रेरणा मिळावी, याउद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु असतात, असेही त्यांनी सांगितले. के.सी.त्यागी, सुरेश चव्हाणके, भीमराव तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.