अकलूज -शरद पवार हे खूप जातीय द्वेषी आहेत. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या नावाने बोंब मारली जाते त्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मराठा नेत्यांनी आपल्या शिक्षण संस्थांत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची तसदी आजवर घेतली नसल्याची टीका महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी १९६८ पासून अनेक आयोग नेमले गेले. मात्र, भाजप सरकारने घटनेच्या तरतुदीप्रमाणे आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही. आम्ही ज्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभेवर घेतले तेव्हा शरद पवार म्हणाले होते, आता पेशवे राजे नेमू लागले आहेत. त्यांच्या विधानातून त्यांचा जातीय द्वेष स्पष्ट झाला आहे. भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण धोरणे घेतली आहेत. याचे परिणाम तुम्हाला भविष्यात नक्की दिसतील. ज्या सवलती आदिवासींना दिल्या जात आहेत त्या सवलती धनगरांनादेखील देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला आहे. आदिवासींसाठी सात हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातील एक हजार कोटी दिलेही आहेत. परंतु ब्राह्मणांचे सरकार, ब्राह्मण मुख्यमंत्री अशा बोंबा मारल्या जात आहेत. हे साफ चुकीचे असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.