पुणे-‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने पुण्याकडे कायमच सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. या पक्षातील नेते मोठे झाले; पण पक्ष संपत गेला ,शहरे,गावे भकास करत गेला ,’ अशा शब्दांत विरोधकांना लक्ष्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनविण्याचे आश्वासन मंगळवारी दिले. भारतीय जनता पक्षाच्या काळातील केंद्र आणि राज्य सरकारांनी पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केल्याचा दावा त्यांनी केला. ‘पुण्याची खडानखडा माहिती असणाऱ्या गिरीश बापट यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत फडणवीस बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार संजय काकडे ,अनिल शिरोळे,आमदार जगदीश मुळीक,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक ,महापौर मुक्ता टिळक, शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याची मेट्रो, उड्डाणपूल यासारख्या दळणवळणाच्या सुविधा असो किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पंतप्रधान आवास योजनेद्वारे मिळणारी घरे, अशा सर्व योजनांची यादी मुख्यमंत्र्यांनी सादर केली. भविष्यात म्हाळुंगे-माण येथे हिंजवडी आयटीपार्कपेक्षा मोठी ‘हायटेक सिटी’ उभारण्यात येणार आहे. पुढील ५० वर्षांत पुणे कुठे असेल, यासाठीचे नियोजन सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. बापट यांच्या रूपाने महायुतीने अनुभवी आणि शहराच्या विकासात योगदान देणारा उमेदवार दिल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसचा जाहीरनामा, बालाकोट हल्ला आणि इतर विषयांवरही त्यांनी सविस्तर भाष्य केले.