पुणे-एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत केला . निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुंडांना भारतीय जनता पक्षाने प्रवेश देऊन पवित्र करुन घेतले आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे तर त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी हा संभ्रमात असलेला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव राष्ट्रवादी कनफ्युज पार्टी असे ठेवावे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाणेर, उत्तर डहाणूकर हाऊसिंग सोसायटी मैदान, सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्स, शिवसाम्राज्य चौक हडपसर अशा चार ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी बाणेर येथील माऊली मंगल कार्यालय येथील पहिल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार विजय काळे आणि भाजप उमेदवार उपस्थित होते.
पुणे शहरामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्या सुटणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. लोकसंख्या आणि अनधिकृत बांधकामामुळे शहराचा बकालपणा वाढला असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही ही परिस्थिती सुधारुन पायाभूत सुविधांचा विकास करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही हे शहर स्मार्ट करू असे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण रिंगरोडच्या कामाला गती मिळवून देऊ असे ते म्हणाले. शहरातील सांडपाण्याचा प्रश्न असो वा इतर कुठलाही प्रश्न असो भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता द्या आम्ही तो सोडवून देऊ असे ते म्हणाले. येत्या तीन वर्षात पुण्याला देशाचे स्टार्ट अप कॅपिटल करू असे ते म्हणाले. त्याबरोबरच पुणे शहरात वायफायची सुविधा उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले. पुण्यात मेट्रो आणि बस यांचे आम्ही ईंटीग्रेशन करणार. एकाच तिकीटावर मेट्रो आणि बसमधे प्रवास करता येईल. ईंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आम्ही तयार करू. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली. पिंपरी-चिंचवडही राष्ट्रवादीकडे राहणार नाही. आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिला आहे. काँग्रेसचे तर अस्तित्वच दिसत नाही असे ते म्हणाले. शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कुठे कुणासोबत युती करायला मिळते का असा विचार आमचा ‘मित्रपक्ष’ करत आहे असे ते म्हणाले.