पुणे- मिटली ,मिटली ,सुटली सुटली अशी वाटणारी काकडे आणि बापट यांची राजकीय कुस्ती सुरूच असल्याचे दिसणार आहे .असा दावा आता राजकीय समीक्षकांकडून करण्यात येतो आहे . अर्थात हि कुस्ती भाजपच्या हितासाठी आहे कि ,अन्य पक्षांच्या हितासाठी आहे ,कि जनतेच्या हितासाठी आहे कि नेतृत्वाचीच हि लढाई आहे ?कि निव्वळ करमणुकीसाठी आहे ? या प्रश्नांचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे .
पालकमंत्री गिरीश बापट हेच आमचे नेते आहेत . त्यांच्याच अधिपत्याखाली पालिकेचा कारभार चालतो अशी वक्तव्ये करीत थेट मुख्यमंत्र्यांसह ,पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष यांच्या पर्यंत भाजपचे सहयोगी खासदार , आणि पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका निभावलेले संजय काकडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांना वाटले होते . आता भाजपमधील हि गटबाजी (राजकीय कुस्ती ) तूर्तास थांबली …पण असे कुणाला वाटते ना वाटते तोच पुन्हा या दोघांचा राजकीय फड रंगला आहे . अर्थात यावेळी गिरीश बापटांनी आपले विधान हा फड रंगविण्यासाठी दिले आहे.
खासदार संजय काकडे राज्यसभेवर आहेत. पुण्यात लोकसभेवर अनिल शिरोळे निवडून आले आहेत . पण शिरोळे हे सुरुवातीच्या काळात म्हणजे नोटबंदीचा विषय आणि त्यास समर्थन देईपर्यंत काकडे यांच्या समवेत राहिले .पण अगदी महापालिकेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण करून उमेदवारी वाटपात काकडे यांनी दाखविलेले स्वारस्य यामुळे गिरीश बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सारखा राजकीय विषयावर मानसिक उपद्रव होत गेला . तिकिटे वाटपापासूनच काकडे बापट गट दिसू लागले .नोटबंदी च्या समयी देखील राजकीय चढाओढीतच भाजपचे 2 मोर्चे निघाले. बापटांना मानणारे त्यांचे एकेकाळचे महापालिकेतील सहकारी असलेले आणि बराच काल पक्षीय राजकारणापासून थोडेसे अलिप्त राहिलेले योगेश गोगावले यांनी शहर अध्यक्ष म्हणून नोटबंदी समर्थनासाठी मोर्चा काढला , आणि नंतर संजय काकडे यांनी जंगी मोर्चां काढला . सगळीकडे विरोधी पक्षांकडून नोटबंदी विरोधात मोर्चे निघालेले असताना हा लक्ष्यवेधी मोर्चा काढून पक्षांतर्गत मोठी अॅकटीव्हीटी दाखवून देण्यात आणि विधानसभेत मुख्यमंत्र्याकडून या मोर्चाचे कौतुक करवून घेण्यात काकडे यांना यश आले. आणि मग पुढे सुरु झाली आणखी चढाओढ … स्मार्ट सिटीचा बोजवारा उडला असताना ,मेट्रो वगळता ,महापालिकेतील २४ तास पाणीपुरवठा योजना असो,शिवसृष्टी असो , वा कोणताही मोठा प्रकल्प असो ..अर्थात अजून कोणताही प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही पण यासाठी होणाऱ्या कामकाजात अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्ष बापट आणि काकडे यांचे मतभेद चव्हाटया वर येतच राहिले . कधी काळी आम्ही हि रात्रीच्या वेळी ‘तसल्या ‘ फिल्म बघत असतो असे विधान करून बापटांनी राज्यात गलका उडवून दिला तर अलीकडे काकडे यांच्या दुसऱ्या भविष्यवाणीने देखील देशभर पक्षात गलका केला .काकडे आणि बापट यांच्यात प्रांताध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी अनेकदा बैठका घेवून सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला . अगदी काही दिवसांपूर्वीच काकडे यांना गुजरातच्या भाकीतामुळे पक्षात अडचणीत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्नही झाले. त्यानंतर काकडे यांनी अगदी मुख्यमंत्री ,प्रधानमंत्री आणि अध्यक्ष यांच्या पर्यंत आपला खुलासा पोहोचविला . आणि बापट यांचे नेतृत्व मान्य केले . याला हाताच्या बोटावर मोजता येतील तेवढे दिवस होतात न होतात तेच बापट यांनी ‘ काय मागायचं ते आताच मागून घ्या ,पुढे काय होईल ते सर्वांनाच ठाऊक आहे ‘ असे विधान द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यक्रमात केलं. एकीकडे भाजपचे स्ट्रॅटेजिस्ट बूथमागे २५ कार्यकर्ते गोळा करण्याच्या आणि निवडणुकीच्या तयारीला लागले असताना कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचविणारे विधान मंत्रिपद भोगत असलेल्या व्यक्तीकडून यावे याविषयी भाजपच्या गोटात तीव्र नाराजी आहे . कोरेगाव भीमा येथील घटनेने सरकार आधीच बॅकफूट असताना गिरीश बापट यांनी विरोधकांच्या हातात कोलीत दिल्याचे दिसते आहे . कॉंग्रेस शिवसेना यासारख्या पक्षांतील नेत्यांनी बापट यांचे विधान उचलून धरत भाजपचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली असून संभाजी ब्रिगेड आणि दलित संघटनानी शनवार वाड्यावर दाखविलेला जोश हि बापटांच्या विधानास कारणीभूत असल्याचे बोलले जाते आहे .
यासर्व पार्श्वभूमीवर बापटांचे नेतृत्व मान्य केलेले खासदार संजय काकडे यांनीही बापट यांनी चुकीचे विधान केल्याचे स्पष्ट केले आहे . एकंदरीत भाजप विरोधकांकडून हैराण होत असताना मिटली ,मिटली ,सुटली सुटली अशी वाटणारी काकडे आणि बापट यांची कुस्ती सुरूच असल्याचे दिसणार आहे . अर्थात हि कुस्ती भाजपच्या हितासाठी आहे कि ,अन्य पक्षांच्या हितासाठी आहे ,कि जनतेच्या हितासाठी आहे कि नेतृत्वाचीच हि लढाई आहे ? या प्रश्नांचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे .