मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढणार असून मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा राज्यात येतोय, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत केला. मी केवळ भाजपचाच मुख्यमंत्री नसून भाजपबरोबर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट करत फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला या वेळी जोरदार टोला लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले, युतीबाबत संभ्रम नाही. कोणी कोणत्या जागा घ्यायच्या याचा निर्णय लवकरच होईल. मित्रपक्षात खुमखुमी असणारे बरेच नेते आहेत. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या ट्रॅपमध्ये येऊ नका. मुख्यमंत्री कोणाचा या वादात पडण्याचे कारण नाही. माध्यमे व काही लोक हा वाद उभा करत आहेत. भाजपमधील पक्षप्रवेशाने घाबरून जाऊ नका, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. इतर पक्षातले चांगले लोक घेण्यात गैर नाही. भाजप पब्लिक अनलिमिटेड पक्ष असून काही झाले तरी ८५ टक्के तिकीट पक्षातील जुन्यांना दिले जाईल, असा विश्वास त्यांनी जुन्या भाजपाईंना दिला. तसेच तिकिटाबाबत कुणालाही आश्वासन कुणी देऊ नये, अशी तंबी त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिली. विधानसभेला पराभूतांशी आपला सामना आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेची लढाई वेगळी आहे. लढाई बदलली की शस्त्रे बदलावी लागतात. क्षेत्र बदलले की रणनीतीतही बदल करावा लागतो, असे स्पष्ट करत मागची १५ वर्षे कुशासनाची होती. पुढची ५ वर्षे महाराष्ट्रासाठी उंच उंच उडण्याची असतील, असे सूतोवाचही फडणवीसांनी या वेळी केले.
कुणासाठीही पक्षात येण्याचा मार्ग खुला, पण जाण्याचा बंद
पुढच्या पिढ्यांच्या वाट्यास दुष्काळाचे दु:ख येऊ नये म्हणून पुढची पाच वर्षे राज्य सरकारचा मुख्य भर नदीजोड प्रकल्प आणि समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवण्यावर असणार आहे. आपले आराध्य दैवत जनता असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आगामी १ आॅगस्टपासून आपण राज्यभरात महाजनादेश यात्रा काढणार आहोत. अन्य
पक्षातून भाजपमध्ये येण्याचा मार्ग खुला आहे. येणाऱ्यास कायमचे पक्षात राहावे लागेल. बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नाही. कुणी, कुणाच्या जवळचा म्हणून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही. योग्य त्यालाच तिकीट देण्यात येईल.