पुणे: आमच्याकडे सत्ता दिल्यास आम्ही शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवून शहर विकासाला गती देण्याचे काम करू त्यातून मोठ्या प्रमाणात रहिवाशांचा त्रास कमी होईल. रस्ते रुंदीकरण व विकास आराखड्याच्या नावाखाली आघाडी सरकारने सामान्याच्या घरांची पाडापाड केली आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता सरकारने विकास आराखडा लादला असल्याने रहिवाशांच्या समस्यात व प्रश्नात भर पडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्या, असे आवाहन आज कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचार पदयात्रे दरम्यान काढले.
कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज आपल्या प्रचाराचा पदयात्रा काढून शुभारंभ केला. भारतीय जनता पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यासोबत सकाळी दहा वाजता कसबा पेठ भागातील सूर्या हॉस्पिटलपासून या पदयात्रेला सुरवात झाली. त्यानंतर पवळे चौकातून मुस्लिम बहुल भाग दर्गा रोड, कागदी पुर्यात जाऊन गिरीश बापट यांनी मुस्लिम समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर भोई आळी, सात तोटी चौक, तांबट आळी, शिंपी आळी, झांबरे चावडी, गावाकोस मारुती आळी भागात घराघरात जाऊन बापट यांनी रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. गल्ल्या-वस्त्याचा दौरा करून मतदारांशी गप्पा मारल्या, तसेच, या ‘रोड शो’ मध्ये प्रत्येकाला व्यक्तीगत भेटून व हस्तांदोलन करून स्थानिकांशी बापट यांनी संवाद साधला. रविवार पेठेतील शनि मारुती मंदीराजवळ पदयात्रेचे समापन करताना स्थानिकांचे प्रश्न समजून घेऊन आपल्या भागाच्या व पुण्याच्या विकासाठी भाजपाला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पदयात्रेत मोठ्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले होते.
यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश ऐनपुरे, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, आनंद मालेगांवकर, विजय मरळ, भारत निजामपूरकर, अरविंद कोठारी, सतीश निजामपूरकर, दादा खत्री, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे, राजेश परदेशी, प्रभागाचे अध्यक्ष गणेश पाचेरकर, योगेश समेळ, सुहास कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, अभय जगताप, देवा जांभुळकर, नामदेव माळवदे, अमित कंक, प्रशांत मुंदडा, शेखर नायडू, निलेश वैराट, नितीन पंडीत, बापू नाईक, संजय तिकवणे, निलेश कदम, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभाताई गोखले, शाबाना देशपांडे, सीमा जांभुळकर, चारू शिंदे, क्रांती खंडारे, वर्षाताई धोंगडे, मृणाल घोळे, कल्पनाताई जाधव आदी उपस्थित होते