पुणे – विद्यमान आमदार गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा भाजपतर्फे, तर रोहित टिळक यांनी कॉंग्रेसतर्फे कसबा विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बापट म्हणाले , मी धंदेवाईक नाही पूर्णवेळ स्वयंसेवक आहे तर टिळक म्हणाले , कोणाशी लढत देण्यासाठी मी उभा नाही , मी मतदारांचे हक्क मिळवून देणे नागरी समस्या सोडविणे यासाठी लढतो आहे
कसबा गणपती मंदिरापासून पदयात्रा काढून आज सकाळी बापट यांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी त्यांच्या सोबत गिरिजा बापट, नगरसेवक अशोक येनपुरे, किरण सरदेशपांडे, राजेंद्र येनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर टिळक यांनी केसरीवाडा येथे श्रीगणेशाची आरती करून आणि मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसह जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेवक श्याम मानकर, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, सुधीर काळे, उल्हास भट उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी बापट आणि टिळक एकाचवेळी आल्याने त्यांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.
बापट म्हणाले, “”युतीच्या माध्यमातून गेली वीस वर्षे मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. महायुती तुटल्यामुळे मी दु:खी झालो आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. अद्यापही मतदारसंघातील काही प्रश्न प्रलंबित आहेत. मी धंदेवाईक नसून पूर्णवेळ स्वयंसेवक आहे. माझी लढत सर्वांबरोबरच आहे. जनता सुज्ञ आहे. मी कोणत्याही उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही. जनताच योग्य काय तो निर्णय घेईल.‘‘
तर टिळक म्हणाले, “”गेल्या वेळेस जनतेचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. परंतु गेल्या पाच वर्षांत मी मतदारसंघात काम करीत आहे. राज्यात आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यांच्या बळावर मी निवडणूक लढवीत आहे. माझी लढत ही कोणाशी नसून, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी उभा आहे. मतदार योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास मला आहे.‘‘