पुणे-
आमचा महाराष्ट्र पुन: पुन्हा अस्थिरता व अराजकाच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे. दु:ख याचेच आहे.;महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दु:खी झाले आहेत. महाराष्ट्राची जनता यावेळेस शिवसेनेला निर्विवाद कौल देईल असे वाटले होते. पण मतविभागणीचा फायदा भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. अखंड महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर निवडणूक लढूनही शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याची सल उद्धव यांनी बोलून दाखवली आहे. उद्धव म्हणतात…
महाराष्ट्राने लाचार होऊ नये, दिल्लीपुढे ऊठसूट लोटांगण घालू नये, महाराष्ट्र अभेद्य आणि अखंड राहावा, मुंबईचे महत्त्व कायम राहावे यासाठीच आम्ही एकाकी झुंज दिली. लढाई विषम होती. दोन्ही बाजूला बलाढ्य सत्ताधीश. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जवळजवळ सर्व सत्ता आमच्या विरोधात उतरली. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. दुसर्याप बाजूला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ हे महाराष्ट्राचे मदमस्त सत्ताधारी आमच्या विरोधात उतरले होते. दोन मदमस्त सत्ताधार्यांतशी झुंज देत शिवसेनेच्या ढाण्या वाघाने जो पल्ला गाठला तो मोलाचा आहे.
प्रचारात आम्हाला जी एक लाट उसळलेली दिसली त्या लाटेचे पाणी किनार्याीवर येण्याआधीच विरले. काही ठिकाणी लाटेत पाणी कमी व फेस जास्त असेच दिसले, पण चौरंगी-पंचरंगी लढतीत जी मत विभागणी झाली त्याचा फायदा जसा भाजपला झाला तसा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला.
राजकारणात कधी कुणाचे नशीब फळफळेल सांगता येत नाही. आता नक्कीच प्रश्ना विचारले जातील की, शिवसेना या निकालाकडे कशी पाहत आहे? आम्ही यावर आजच भाष्य करणार नाही, पण ज्यांनी हे अधांतरी मतदान केले ती सर्वशक्तिमान जनता या निकालाकडे कोणत्या नजरेने पाहते? महाराष्ट्राच्या वाट्यास निकालांचा जो लटकता बुलबुल आला आहे त्यामुळे शेवटी हे राज्य टिकेल काय? ही शंका जोर धरू लागली आहे.
अखंड महाराष्ट्राचे स्वप्न विजयी झाले नसेल तर असले विजय निदान महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीने तरी कुचकामी ठरतात. ज्यांच्यासाठी आम्ही हा वडवानल पेटवून महाराष्ट्रात विचारांचे रान उठवले त्या जनताजनार्दनास आम्ही कोणताही दोष न देता एकच विचारीत आहोत की, मायबाप जनहो, जो निकाल तुम्ही दिलाय त्यामुळे तुम्ही तरी खूश आहात का? समाधानी आहात का? आमचा महाराष्ट्र पुन: पुन्हा अस्थिरता व अराजकाच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे. दु:ख याचेच आहे.