पुणे: महाराष्ट्रात इतर राज्यातील म्हणजे परप्रांतीयांचे मतदार संघ नको , महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांनी मराठी मातीशी एकरूप होवून राहावे असे पुन्हा एकदा मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना पुण्यामध्ये संतनामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि राज ठाकरे हे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
राज ठाकरे यांनी यावेळी छोटेखानी भाषण केले “पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याबद्दल खूप ऐकून होतो मात्र, आज प्रत्यक्ष त्यांना भेटून फार आनंद झाला. आज त्यांना भेटल्यानंतर सगळ्यात आधी त्यांच्या पाया पडलो. आज राजकारणात अशी फार कमी लोकं आहेत.” असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकाशसिंह बादल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला
.ते पुढे म्हणाले “मी कुठे तोडाफोडी करायला आलो आहे? माझं म्हणणं इतकंच आहे की, समोरच्या राज्याने आम्हाला मान द्यावा, आम्हीही त्यांना योग्य तो मान नक्कीच देऊ. शीख बांधव जिथेही राहिले त्यांनी कधीही कुठे आपला मतदारसंघ निर्माण केलेला नाही. या मातीशी एकरुप व्हा. एवढंच आमचं म्हणणं आहे. मराठी बांधवांनी देखील कधी असं केलं नाही. इतर राज्यातील लोकांनीही तसंच राहावं.” असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतियांच्या मुद्द्याला हात घातला.” ‘इथं जमलेल्या शिख बांधवांना मी मराठीच म्हणतो. आणि पावसाळाच्या तोंडावर महाराष्ट्रात बादल येणं हा योगायोगच म्हणावा लागेल. या निमित्ताने महाराष्ट्रातील दुष्काळ दूर व्हावा हीच इच्छा.’ अशी कोटीही राज ठाकरेंनी केली. घुमान येथे होत पार पडलेल्या साहित्य संमलेनासाठी राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी साहित्य-समंलेनातील होणाऱ्या वादांवरही टीप्पणी केली. “आधीच साहित्य संमेलनात वाद-विवाद असतात. पुन्हा मी जाऊन आणखी वाद नको आणि तशीही माझी तब्येत बरी नव्हतीच.. खरोखरच बरी नव्हती बरं का… म्हणून मी ‘गप गुमान’ घरी बसून राहिलो.
महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं हे संत नामदेवांपासूनचं आहे. इतक्या जुन्या नात्याचा धागा हा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. घुमान साहित्य संमेलनात पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी जी व्यवस्था केली, त्यामुळे महाराष्ट्र-पंजाब आणखी जवळ आला आहे, अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.याशिवाय देशासाठी मराठे आणि शीखांनी मोठा लढा उभारला होता. या दोन्ही राज्यांचं देशासाठी कार्य अद्वितीय आहे, असंही फडणवीस म्हणाले.
संत नामदेव पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्यामुळे मी आभारी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच भाग्याचा आहे, अशी प्रतिक्रिया पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र आणि पंजाबचं प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं आहे. ते आणखी घट्ट झालं आहे. मी महाराष्ट्राकडून खूप काही शिकलो, असं बादल म्हणाले.