‘बुद्धीजीवी वर्ग भाजपाच्या पाठीशी’ : मीनाक्षी लेखी
पुणे :
‘कॉंग्रेसला कंटाळून बुद्धीजीवी वर्गाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मतदान केल्याने परिवर्तन झाले. बुद्धीजीवी वर्गाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पूर्ण परिवर्तन करून भाजपला विजयी करावे,’ असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि खासदार मीनाक्षी लेखी यांनी केले.
” फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ संस्थेतर्फे ‘संपर्क-संवाद’ अभियानातंर्गत बुद्धीजीवी संमेलनात त्या बोलत होत्या. माजी खासदार प्रदीप रावत अध्यक्षस्थानी होते. “फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ चे प्रदेश समन्वयक आर.पी.सिंग आणि सहसमन्वयक उषा वाजपेयी उपस्थित होते. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी मौलाना आझाद स्मारक सभागृहात झाला.
मीनाक्षी लेखी म्हणाल्या,” समाज परिवर्तनात बुद्धीजीवी वर्गाची भूमिका महत्वाची असते. हाच वर्ग दिशा देण्याचे काम करतो. भविष्य घडविण्यासाठी हा वर्ग पुढे आला आहे हे पाहून समाधान वाटते. “राजकारण हे रोजगाराचे साधन नाही तर योगदान देण्याचे आवाहन आहे’ हे नरेंद्र मोदींचे प्रतिपादन बुद्धीजीवी वर्गाला आवडले आहे’ , असेही निरीक्षण मिनाक्षी लेखी यांनी नोंदविले.
“भ्रष्टाचाऱ्यांना खाली खेचून देशाची प्रतिमा जगात उंचावण्याचे काम नरेंद्र मोदी पंतप्रधान या नात्याने करीत आहेत. महाराष्ट्रदेखील त्यांच्या पाठीशी उभा राहील’, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी पोलीस आयुक्त संतोष दत्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. महेंद्र गलांडे, विशाल चास्कर, पियुष बाफना, राजीव गुप्ते, अच्युत दिक्षीत आदी उपस्थित होते.