… तर राज्यभर तांडव करेन-शरद पवार यांचे गलिच्छ राजकारण …
मुंबई – छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह भालचंद्र नेमाडे डॉ. नागनाथ कोतापल्ले, विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे , जितेंद्र आव्हाड यांच्यासह -काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानेही बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध केल्यानंतर आज दुपारी बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रभर तांडव करेन’, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.आणि सर्व विरोधकांना ; पुरंदरेंच्या बाजूने आपण रणांगणात उतरलो असल्याचे दाखवून दिले आहे यावेळी बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार यांचे गलिच्छ राजकारण आहे, असा आरोपही राज यांनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत असताना राज यांनी पवारांवर केलेले आरोप राजकीय वर्तुळात महत्वपूर्ण मानले जात आहेत . स्वतः नामनिराळे राहून पवारच फूस देवून गालिच्छ राजकारण करीत असल्याचा राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी कसे उत्तर देणार याकडे आता लक्ष लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमधीलच काही मंत्र्यांनी मिळून हे सगळं कुभांड रचलं आहे. मला फडणवीस यांची बाजू घ्यायची नाही मात्र ते खुर्चीवर बसल्यापासूनच हे राजकारण सुरू झाले आहे. पवारांना भाजपमधील कोण कोण सामिल आहेत ते मला महित आहेत पण मी त्यांची नावे सांगणार नाही. फडणवीस ज्युनियर आहेत. ब्राम्हण आहेत. म्हणूनच हे जातीचं राजकारण चाललंय. पवारच विष कालवण्याचे काम करत आहेत’, अशी तोफ राज यांनी डागली.
बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा साक्षात्कार आता ५० वर्षांनतर कसा काय झाला?, असा सवाल राज यांनी केला. शरद पवार यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता. आत्ता आत्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. अजित पवारही त्यांचा आदर करतात. मग आता अचानक हे घुमजाव कशासाठी?, असा सवालही राज यानी विचारला. केवळ एखाद्या वाक्यासाठी संपूर्ण शिवचरित्रावर आक्षेप घेणे योग्य नाही. त्यातही जे आक्षेप आहेत त्यावर खुली चर्चा होऊ शकते. त्यासाठी एवढा गदारोळ माजवण्याची गरज नाही, असे राज यांनी ठणकावले. राज यांनी कृष्णनीतीचाही यावेळी दाखला दिला. कृष्णाच्या १६ हजार बायका होत्या यावर चर्चा करत बसायचं की कृष्णनीतीचं आचरण करायचं?, असा सवाल राज यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांचाही राज यांनी समाचार घेतला. पवारांच्या गलिच्छ राजकारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्यात एवढं बोलण्याची हिम्मत आली आहे. पवारांनीच आव्हाड यांना फूस लावली आहे, असा आरोप राज यांनी केला. माझ्या आजोबांच्या पुस्तकातील दाखले आव्हाडांनी देऊ नयेत, असेही राज यांनी सुनावले.
नेमाडे यांच्यावर टीका
पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणारे ज्ञानपीठप्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्यावरही राज यांनी टीका केली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रज वा विंदांच्या आचरणातून घ्यायला हवेत, असा टोला राज यांनी लगावला. नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यासही विरोध झाला होता तरीही त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलाच ना, असा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला.
ए बी पी माझा या वृत्तवाहिनीने राज ठाकरे यांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केली … यातून राज ठाकरे नेमके काय म्हणाले ते त्यांच्या शब्दात प्रत्यक्ष जसेच्या तसे ऐका आणि पहा … इथे ए बी पी माझा ची यू ट्युब वरील संबधित लिंक इथे दिली आहे