*अमित शहा यांचा खटला 7 महिन्यात निकाली निघतो तर मुस्लिम तरूण 10-10 वर्षे तुरूंगात सडताहेत
*बॉम्बस्फोटाचे खटले रोजच्या रोज चालवा, दोषी असेल तर जरूर सजा द्या पण निर्दोष असेल तर त्याला सोडून द्या, तुरुंगात सडवू नका
*11 टक्के मुस्लिम समाज असूनही केवळ 2.2 टक्के मुस्लिम तरूण पदवीधर होत आहेत
*आम्हाला मासे नको पण मासे पकडण्याचे प्रशिक्षण तरी द्या
*महाराष्ट्रातील 70 लाख मुस्लिम गरीब आहेत
*महाराष्ट्र सरकारमध्ये एकही आयएएस अधिकारी मुस्लिम का नाही
*मुस्लिम मुले डॉक्टर, इंजिनिअर, आयपीएस का होत नाहीत
*देशातील विविध कमिशनने मुस्लिम समाज शिक्षणात मागास व दारिद्री रेषेत असल्याचे सांगितल्यानंतर त्याकडे का दुर्लक्ष केले जाते
*सच्चर, रंगनाथन समितीच्या शिफारशीचे काय झाले, कोर्टानेही मुस्लिम मागास असल्याचे मान्य केले आहे
*मराठ्यांना पण आरक्षण द्या पण मुस्लिमांना नाही म्हणू नका सरकारला टोला
*सबका साथ, सबका विकास मग मुस्लिमाना आरक्षण का नाकारता
*आम्ही हिंदुस्थानी आहोत, आमच्या राष्ट्रभक्तीबाबत शंका नको
*पाकिस्तानी हाफिज सईदविरोधात सर्वप्रथम आम्ही भूमिका मांडली
*पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये किती मुस्लिम तरूणांना प्रवेश मिळतो
*मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मुस्लिमांसाठी काहीही केले नाही
———————–
पंतप्रधानांना टोला –पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे लंडनचे कपडे घालण्याची आमची ऐपत नाही. देशभरातील मुस्लिमांची स्थिती वाईट आहे. आमची मुलंही डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस व्हायला हवीत. त्यासाठीच त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे विदेशी कपडे परिधान करणाऱ्या मोदींना, आमच्या मुलांच्या अंगावर कपडे पाहायचे आहेत की नाही? असा घणाघाती सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.तसंच सबका साथ, सबका विकासमध्ये आमचाही समावेश करा. राजकीय दृष्टी आम्ही तुमच्या सोबत कधीच नसू. मात्र तुम्ही सर्वांचा विकास करायलाच हवा, असं ओवेसींनी नमूद केलं.
मुस्लिम समाजाची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्रात 11 टक्के मुस्लिमांची संख्या आहे. मात्र त्यापैकी 70 टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळायलाच हवं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.शिवसैनिकांची निदर्शने, पोलिसांची नोटीस आणि तापलेलं वातावरण, या पार्श्वभूमीवर पुण्यात असदुद्दीन ओवेसी यांचं भाषण झालं. मूल निवासी मंच आणि अॅक्शन फॉर महाराष्ट्र या संघटनेने मुस्लिम परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ओवेसींनी मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने मत मांडलं.
बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित खटले रोजच्या रोज चालवले तर लवकर निकाल लागतील आणि किती पुरावे खरे आणि किती खोटे हे स्पष्ट होईल, असे ओवेसी म्हणाले. जेलमध्ये सेलिब्रेटी आणि मुस्लीम तरुण यांच्यात भेदभाव करू नये. खोट्या आरोपांखाली जेलमध्ये अडकवण्यात आलेल्या मुस्लीम तरुणांची लवकर सुटका करावी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे, असे आवाहन ओवेसी यांनी केले.
संजय दत्त याला जेलमध्ये विशेष वागणूक मिळते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गंभीर आरोपाच्या खटल्यातून झटपट क्लीन चीट मिळते पण मुस्लीम तरुण जेलमध्ये अनेक दिवस सडत राहतात. हा प्रकार बंद व्हायला हवा, असे ओवेसी यांनी सांगितले. आम्हाला मुस्लीम असल्याचा अभिमान असला तरी याचा अर्थ आम्ही देशभक्त नाही असा होत नाही, असे ओवेसी म्हणाले. त्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या हिंसेला विरोध करताना कट्टर हिंदूत्ववादी राजकीय संघटनांनाशी मैत्री अशक्य असल्याचे सांगितले.
शिवसेनेकडून जोरदार निदर्शने—–
दरम्यान शिवसैनिकांनी कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकात जोरदार निदर्शने करून ‘एमआयएम’चे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेविरूद्ध आक्षेप नोंदवला. शिवसैनिकांचा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त केल्यामुळे कोंढव्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, शहरातील विविध भागांतून सुमारे तीनशे शिवसैनिकांना उचलण्यात आले, तर ज्योती चौकात निदर्शने केलेल्या सुमारे दीडशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
शिवसेनेकडून ओवेसी यांच्या सभेला होणारा विरोध पाहता पोलिसांनी शहरात सगळीकडेच बंदोबस्त तैनात केला होता. माजी आमदार महादेव बाबर, सेनेचे उपशहरप्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, युवासेनेचे अध्यक्ष किरण साळी, माजी नगरसेवक प्रशांत बधे, नगरसेवक अशोक हरणावळ, सचिन तावरे, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, राहुल कलाटे आणि बाबा धुमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी साडेचार ते सायंकाळी सहाच्या दरम्यान ज्योती हॉटेल चौकात टप्प्याटप्याने जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांच्या विरोधाची धार वाढल्यामुळे त्यांना आवरणे पोलिसांना मुश्किल झाले होते. त्याचवेळी ओवेसी यांच्या सभेला जाणारे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यात शाब्दिक चकमकी झडल्या. परिणामी पोलिसांची धावपळ क्षणागणिक वाढत होती.
अप्पर पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याळ, उपायुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे आणि श्रीकांत पाठक यांनी शिवसैनिकांना आवर घालून ताब्यात घेतले. ज्योती हॉटेल चौकात हा गोंधळ सुरू असतानाच तेथून काही अंतरावरच ओवेसी यांची सभा सुरू झाली होती. पोलिस शिसैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या १५-२० मिनिटांनंतर ओवेसी यांची सभा संपली. सभा संपल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त अधिक आवळून कुठेही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेतली. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर वातावरण तापण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दोन-तीन पोलिस व्हॅन भरून गेल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी झडू लागल्या. पोलिस काही महिला शिवसैनिकांना व्हॅनमध्ये बसवत असतानाच गर्दीमधून पोलिसांच्या दिशेने चप्पल भिरकावली गेली. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत, या घटनेकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले.
शिवसेनेचा विरोध ‘एमआयएम’च्या पुण्यातील ‘लाँच’साठी पथ्यावर
शहरातील पक्षवाढीसाठी सध्या काहीच कार्यक्रम हाती नसल्याने शिवसेनेने ओवेसींच्या सभेला विरोध करत संघर्षात उडी घेतल्याचे बोलले जात आहे. ओवेसींना विरोध केल्याने हिंदुत्वाचा अजेंडा घेवून शिवसेनेने भाजपलाही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आहे. सेनेने केलेल्या विरोध एकप्रकारे ‘एमआयएम’च्या पुण्यातील ‘लाँच’साठी पथ्यावर पडल्याची चर्चा आहे.एमआयएमचे राज्यात दोन आमदार निवडून आल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यात आपले संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी ते सभाही घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यात मुस्लिमांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ओवेसी यांची सभा ठरली होती. परंतु, ओवेसीच्या सभेवर नुकतेच शिवसेनत घरवापसी झालेले माजी आमदार विनायक निम्हण यांनी आक्षेप घेतला. ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारायची की नाही, हा पोलिसांच्या अखत्यारितील विषय होता. परंतु ओवेसी हे भावना भडकविणारी भाषणे करतात असा मुद्दा उपस्थित करत सेनेने त्यांच्या सभेला विरोध केला. यातून आपले हिंदुत्ववादी राजकारण सेनेने आपसूक साधले.पुणे शहरातील आठही आमदार भाजपाचे आहेत. त्यामुळे येथे आपले राजकारण रेटायचे असेल तर हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आक्रमक होण्यासाठी सेनेकडे दुसरा पर्याय नसावा. याच कारणावरुन त्यांनी एमआयएमसोबत संघर्ष केला. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सेनेची बांधणी सुरु झाली असे म्हणता येईल. निम्हण यांनी शहरप्रमुख पद स्वीकारल्यानंतर पहिल्या आठवड्यात ओवेसीच्या सभेला आक्षेप घेत शिवसेना कार्यकर्त्यांमधील आक्रमकपणा जागा करुन नेतृत्वाचेही चुणूक दाखवून वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बुधवारी कोंढव्यात निदर्शने केली. या शिवाय शहरात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याने संपूर्ण शहरात आज शिवसेना आणि ओवेसी यांच्या नावाची चर्चा होती़ शिवसेनेचा पिंडच आंदोलनाचा आणि एखाद्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा आहे़ मुळचे शिवसैनिक असलेल्या निम्हण यांनी कार्यकर्त्यांची ही नस नेमकी ओळखून तिला या निदर्शनाद्वारे मोकळी वाट करुन दिली़ शिवसेनेने आठ वर्षांपूर्वी वीज मंडळाच्या कार्यालयावर केलेल्या आंदोलनानंतर ही मोठी निदर्शने असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.शिवसेनेने केलेला हा विरोध एमआयएमच्याही पथ्यावरच पडला आहे. या विरोधामुळेच ओवेसीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले़ या विरोधानंतरही ओवेसी यांनी भाषण केलेच. त्यांनाही आपले संघटन वाढविण्यासाठी ही आयतीच संधी मिळाली. एका अर्थाने ओवेसींच्या सभेवरुन या उभय पक्षांकडून झालेले राजकारण या दोघांच्याही हिताचेच ठरले आहे.