मुंबई-चिक्की घोटाळ्यामुळं चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आता गरिबांना आपल्या चपला उचलायला लावतात या आरोपावरून नव्या वादात अडकल्या आहेत. दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असताना पंकजांनी स्वत:च्या पायातील चप्पल सोबतच्या कर्मचाऱ्याला उचलायला लावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. तसं दृश्यच वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानं पंकजांवर टीकेची झोड उठली आहे.तर मी एक नाही १० माणसे माझ्या चपला उचलायला ठेवेल; चप्पल उचलणारा माझा कर्मचारी होता , तो दिसला मी अनवाणी पायाने गेले ते नाही दिसले.. अशा प्रत्त्युत्तराने मिडीयावर हि तोंडसुख घेतले आहे
पंकजा मुंडे यांनी नुकताच परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान पावसामुळं चिखलमय झालेल्या एका रस्त्यावरून जात असताना त्यांनी स्वत:च्या पायातील चप्पल काढून ठेवली. त्यांची ही चप्पल सोबतच्या कर्मचाऱ्यानं हातात घेतली आणि तो त्यांच्या मागे चालू लागला. एका वृत्तवाहिनीनं या प्रसंगाचं चित्रण केलं. ते प्रसिद्ध होताच विरोधकांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘पंकजा मुंडे यांचं हे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे सरकार कोणत्या मानसिकतेचं आहे हेच यातून दिसतं, अशी टीका काँग्रेसनं केली आहे. ‘शेतकरी व गोरगरिबांचं भलं करण्याच्या या सरकारच्या बाता म्हणजे निव्वळ देखावा आहे. जे मंत्री स्वत:ची चप्पल एखाद्या सामान्य गरीब माणसाला उचलायला लावतात, ते शेतकऱ्यांचं काय भलं करणार,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते नासिर जकारिया यांनी केला आहे.
पंकजा यांनी दिले स्पष्टिकरण
या प्रकारावरून टीकेची झोड होत असल्याचे पाहून पंकजा यांनी या बाबत स्पष्टिकरण दिले. त्या म्हणाल्या, ”ज्याने चप्पल उचली तो शासकीय कर्मचारी नाही तो माझा खासगी कर्मचारी आहे. चप्पल उचलण्यासाठी मी एक नव्हे १० माणसं ठेवेन. मीडियाला चप्पल उचलाताना माझा कर्मचारी दिसला. पण, अनवानी पायाने चिखलातून चालत असलेली मी दिसली नाही”, असेही त्या म्हणाल्या.