नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बनावट पदवी प्रकरणी अटक झाली असताना माजी कायदामंत्री सोमनाथ भारती एका नव्या वादात सापडले आहेत. सोमनाथ भारती यांच्याविरोधात त्यांची पत्नी लिपिता भारती यांनी महिला आयोगाकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सोमनाथ भारती यांना महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे.
‘मला वेगळे व्हायचे आहे. आपल्याला २०१० पासून बेदम मारहाण केली जात आहे. मी हे शब्दांत सांगू शकत नाही’, असे लिपिता भारती यांनी महिला आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पतीला घटस्फोट देऊन आपल्याला मुलांसोबत सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे असल्याचेही लिपिता भारती यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सोमनाथ भारती यांना महिला आयोगाने नोटीस पाठवली असून २६जूनपर्यंत त्यांना हजर होण्यास सांगितले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी सांगितले की, लिपिका भारती या प्रचंड घाबरल्या आहेत. पती सोमनाथ भारती यांनी त्यांना मारहाण केली आहे. शिविगाळ केली आहे. एवढेच नव्हे पतीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी सोमनाथ भारती यांना नोटीस बजावून त्यांना २६ जूनला बोलवण्यात आले आहे.