(लेखक — प्रथमेश नारविलकर)
‘भ्रष्टाचार करने वालो, जनता माफ नही करेगी’ या आशयाचे कँपेन मोदींच्या बीजेपीने लोकसभा निवडणुकीत चालवले. त्याची जोरदार चर्चा झाली, प्रतिसादही मिळाली. परंतु महाराष्ट्रातील आजची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता ‘आता हीच जनता तुम्हाला येत्या काळात माफ करणार नाही’ असं म्हणावं लागतय.
खरतर महाराष्ट्राच्या जनतेसाठी आजचा दिवस दुर्दैवीच म्हणावा लागेल. कारण ज्या भ्रष्ट राष्ट्रवादीला नाकारून जनतेने बीजेपीला डोक्यावर घेतले त्याच बीजेपीने आज जनतेकडे सत्तेच्या लालसेपोटी दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने आज लाखो प्रश्न सामान्यांना पडले असणार. परंतु त्याचं एकमेव उत्तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे आणि त्यांच्या सरकारकडे आहे; ते उत्तर असे की, ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी जे आम्हाला पाठिंबा देतील, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ’
अरे मग, निवडणुकीआधी तुम्हीच ओरडून सांगत होतात ना, की आघाडी सरकारनी विशेषत: राष्ट्रवादीने महाराष्ट्राचा कसलाही विकास केला नाही. तुमचे सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर म्हणत होते, ‘राष्ट्रवादी इज नॅच्युरली करप्ट पार्टी’ मग आता काय एक महिन्यात त्यांनी सज्जनतेचं ‘सोवळ’ नेसलं, का अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की, तुमच्या सोबत येऊन राष्ट्रवादी महाराष्ट्राचा विकास करू शकते?
देवेंद्रजी,
खरतर जनतेला तुमच्याकडूनच अपेक्षा होत्या, परंतु आज प्रकर्षानं हे स्पष्ट झालं की महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही चालवणार नाहीत तर त्याची सुत्र दिल्लीतून हलविली जातील आणि नेतृत्त्व करतील महाराष्ट्राचे एकमेव ‘साहेब’…
लक्षात ठेवा कुबड्यांवर उभे राहीलेले हे तुमचे सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि ज्यावेळी पुन्हा निवडणुका होतील त्यावेळी ‘जनता तुम्हाला माफ करणार नाही…!’
– प्रथमेश नारविलकर
—-