समाजातील वाढती अराजकता, ढासळलेली नितीमत्ता, अंधश्रध्दा, रुढी परंपरा, चालिरीती यांना बळी पडून नागरीकांची होणारी फसगत व त्यातून वाढलेली व्यसनाधिनता, गुंडगिरी या सर्वांचा समुळ नायनाट व्हावा, अशी अपेक्षा काँग्रेस-आरपीआय (कवाडे गट)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.
प्रियदर्शनी मित्र मंडळ व मनिष आनंद यांच्यावतीने शुक्रवारी रात्री खडकी येथे आयोजित करण्यात आलेल्या रावणदहन कार्यक्रमप्रसंगी निम्हण बोलत होते. निम्हण यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी कर्नल पांडे, संजय खडसे, दादा कचरे, पूजा आनंद, अजय निम्हण, समीर धुमाळ आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले, समाजातील वाईट प्रवृत्ती वाढतच चालल्या आहेत. त्यांचे त्यांना वेळीच लगाम घालण्याची आवश्यकता आहे. रावणदहनच्या निमित्ताने समाजातील अशा सर्व वाईट प्रवृत्ती नाहीशा करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा करावी. यावेळी खडकी परिसरातील तब्बल ७ ते ८ हजार नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
दरम्यान, शनिवारी सकाळी राजभवन परिसरात काढलेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘पारधी समाजाचे अध्यक्ष सुनिल काळे पदयात्रेत सहभागी झाले होते. कॉंग्रेसला मत म्हणजे विकासाला मत, विनायक निम्हण आगे बढो’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ही पदयात्रा पडाळ वस्ती, भाऊ पाटील रोड, कांबळे वस्ती मार्गे चंद्रमणी संघ येथे विसावली. यावेळी रमाताई भोसले, मीरा माने, राहूल गायकवाड, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष राजू पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.