केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन
- इंडिया रबर एक्स्पो २०१९ प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष विक्रम मक्कर यांच्यासह सुरेश प्रभूंची उपस्थिती
मुंबई – रबर उद्योग हा भारताच्या आर्थिक प्रगतीचा ट्रिगर असून भारतीय उद्योगाने महत्त्वाच्या अनेक जागतिक बाजारपेठांवर परिणाम घडवणारी सकारात्मक भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतेच येथे केले. बॉम्बे कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या इंडिया रबर एक्स्पो २०१९ या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पेट्रोकेमिकल्स रिलायन्स इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल शहा, सन्माननीय पाहुणे म्हणून त्रिपुरा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टिंकू रॉय व बीकेटी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा केएम फिलिप पुरस्कार विजेते अरविंद पोद्दार हे नामवंत उपस्थित होते.
इंडिया रबर एक्स्पो २०१९ चे (आयआरई २०१९) आयोजन ऑल इंडिया रबर इंड्स्ट्रीज असोसिएशनतर्फे (एआयआरआयए) करण्यात आले. आशिया खंडातील अशा स्वरुपाचा हे सर्वांत मोठे प्रदर्शन असून त्यात ५० देशांचे प्रतिनिधी, तसेच रबर उद्योगातील कंपन्यांची ३६० हून अधिक दालने होती. आयआरई २०१९, एआयआरआयए आणि ओरिएंटल रबर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विक्रम मक्कर, तसेच प्रदर्शनाचे निमंत्रक विष्णू भीमराजका यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली राबवल्या गेलेल्या या उपक्रमाने दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. याआधी चेन्नईत वर्ष २०१७ मध्ये झालेल्या प्रदर्शनाच्या तुलनेत यंदाच्या प्रदर्शनाची व्याप्ती दुप्पटीने वाढली आहे.
यंदा बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये २७००० चौरस मीटर जागेत भरवण्यात आलेले आयआरई २०१९ हे प्रदर्शन प्रगती, देवाण-घेवाण व सहयोगासाठी मौल्यवान व्यासपीठ ठरले. वर्ष २००१ मध्ये सुरवात झाली तेव्हा ते केवळ ३००० चौरस मीटर जागेत आयोजित करण्यात आले होते. गेल्या १८ वर्षांत त्याच्या जागेचा नऊपट विस्तार झाला असून त्याला २७००० हून अधिक प्रेक्षकांनी भेट दिली.
उद्घाटन केल्यानंतर बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, “व्यावसायिक गुंतवणूका व सहयोग करण्यासाठी सुयोग्य व पसंतीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आता आपल्याला फायद्यांचे एकत्रीकरण करुन भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची गरज आहे, ज्यासाठी मी याआधीच एक योजना तयार केली आहे. त्यातील २० टक्के रक्कम निर्मिती क्षेत्रातून येईल. या योजनेमध्ये रबर उद्योगाचे भरीव योगदान असेल, यासाठी मी प्रयत्न करेन.”
विक्रम मक्कर म्हणाले, “रबर उद्योग हा सर्व उद्योगांचा जीवरक्षक असून कोणताही उद्योग रबरापासून बनवलेल्या उत्पादनांखेरीज काम करु शकत नाही. रबर हे सर्व उद्योगांसाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे. दुसरीकडे जागतिकीकरणाचा स्वीकार करणे भारतभरातील व्यवसायांना अनिवार्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर एआयआरआयएने आयोजित केलेले इंडियन रबर एक्स्पो २०१९ हे प्रदर्शन भारत व परदेशांतील रबर उद्योगासाठी अद्वितीय व्यासपीठ आहे.”
ते पुढे म्हणाले, “ या प्रदर्शनाने जगासाठी एक उदाहरण घालून दिले आहे. ते म्हणजे भारतीय रबर उद्योग हा तंत्रज्ञान, अभिनवता व स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठांतील उभरत्या संधी याबाबत गरुड भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन (एआयआरआयए) या संघटनेने आपल्या कामाने वर्षानुवर्षे लोकप्रियता संपादन केली असून या प्रदर्शनाला रबर क्षेत्राच्या उत्कृष्टतेचे सर्वांगीण प्रतिक बनवत राष्ट्रीय पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीला पोचवले आहे. प्रदर्शनात कच्च्या मालाच्या पुरवठादारांनी गुंतवणूक केली असून सर्व रबर यंत्रसामग्रीचे भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. जगभरातील तंत्रज्ञांनी व तज्ज्ञांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण करणाऱ्या कार्यशाळा घेतल्या आहेत. आयआरई २०१९ हे प्रदर्शन भारतीय रबर उद्योगाच्या सुवर्णयुगासाठी खरोखर चालना देणारा घटक ठरेल.”
संरक्षण, पायाभूत सुविधा, विमान उत्पादन व वाहतूक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात स्थानिकीकरण होण्याची गरज आहे, कारण भारत अद्यापही या क्षेत्रांत प्रचंड गुंतवणूक करत असून तंत्रज्ञान व उपकरणे खरेदी करत आहे. भारतीयीकरणातून स्वयंपूर्णता हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्याला रबराच्या दर्जेदार सुट्या भागांची गरज आहे, या मुद्यावर श्री. मक्कर यांनी भर दिला.
तंत्रज्ञ असलेल्या विक्रम यांना रबर उद्योगाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पश्चिम जर्मनीतील सीम्पेलकाम्प, तसेच अन्य प्रतिष्ठित कंपन्यांतून पूर्ण केले आहे. रबर उद्योगातील उत्तम कामगिरीचा पूर्वेतिहास असलेल्या विक्रम यांना प्रकल्प अंमलबजावणी, उपकरणे निवड व आधुनिकीकरणाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्याकडे प्रक्रिया व संमिश्रण यातील तांत्रिक स्पर्धात्मकता, तसेच उत्पादन व खरेदी यातील कौशल्यही आहे. श्री. मक्कर हे तिसऱ्या पिढीचे उद्योजक असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज ही स्थापनेचा ७० वा वर्धापनदिन साजरा करत असलेली कंपनी भारतातील कन्व्हेयर बेल्ट्सची एक सर्वांत मोठी उत्पादक म्हणून उदयाला आली आहे.
आयआरई २०१९ प्रदर्शनात चीन, कोरिया, जपान व युरोपमधील देश सहभागी झाले. प्रदर्शनात खास रबर परिषद, कार्यशाळा, खरेदीदार-विक्रेते मेळावा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मक्कर यांच्या नेतृत्वाने रबर उद्योगातील कुशल व बुद्धिमान तंत्रज्ञ, धोरणकर्ते, लघु व मध्यम उद्योग, खरेदीदार, विक्रेते व जागतिक बड्या कंपन्यांना एकत्र आणले.