पुणे-झी मराठी वाहिनीवरील “तुला पाहते रे” मालिका बंद करा, अशाप्रकारची मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मालिकेत 20 वर्षांची मुलगी 40 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचे दाखवले आहे. हे महाराष्ट्रासाठी घातक असून त्यातून चुकीचा संदेश समाजात जात असल्याचे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी म्हटले आहे.त्यांनी जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना निवेदन देऊन ही मालिका बंद करण्याची मागणी केलीय अन्यथा आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
प्रदीप नाईक यांनी दिलेल्या निवेदनात या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कुठलाही संदेश जात नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचे म्हटले आहे. मालिकेत 20 वर्षाची मुलगी 40 वर्षीय इसमाच्या प्रेमात पडल्याचे दाखवले आहे. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील 20 वर्षीय मुलीचे लग्न 40 वर्षीय व्यक्तीसोबत लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.