मुंबई ( शाहरुख मुलाणी ) – भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या जैश ए महंमदचा पाकव्याप्त काश्मीरमधील तळ उध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे आपण अभिनंदन करतो. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने दाखविलेल्या या शौर्याला आपण सलाम करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली.
खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर हा हल्ला करणारे व त्यांना मदत करणारे, यांच्यावर कारवाई करण्यास सरकारने सैन्याला पूर्ण मोकळीक दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. गुप्तचरांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाची विमाने यशस्वी कामगिरी करून सुरक्षित परतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वात देश सुरक्षित असल्याचे या वेळी दिसून आले. त्यांनी सांगितले की, भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया सहन करणार नाही आणि नवा भारत दहशतवादमुक्त असेल हे या कारवाईवरून दिसून आले.