नवी दिल्ली -राजभवनामध्ये नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधीही पार पडला. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रीपदे आणि तीन राज्यमंत्रीपदे देण्यात आली आहेत. यामध्ये एक शिवसेनेच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रीपद आले आहे. अकोल्यातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आधीच्या मोदी सरकारमध्ये दहा मराठी चेहऱ्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. यामध्ये नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अनंत गीते, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरे, रावसाहेब दानवे, हंसराज अहीर, रामदास आठवले यांचा समावेश होता. पण शपथविधीनंतर काही दिवसांमध्येच गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर २०१५ मध्ये रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील आठ चेहरे मोदी यांच्या मंत्रीमंडळात सहभागी होते.
पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्याधर्तीवर मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मंत्रीपदे मिळतील अशी आशा होती. मात्र, २०१४ च्या तुलतेन महाराष्ट्राला कमी मंत्रीपदे देण्यात आली आहेत. गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती. आता गडकरींसह चार खासदारांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे. तर दानवेंसह तीन खासदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
दिग्गजांच्या पराभवामुळे अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. परंतु या दोन्ही खासदारांना कोणते मंत्रीपद मिळते याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
केंद्रीय मंत्री –
– नितीन गडकरी (महाराष्ट्र)
– प्रकाश जावडेकर(महाराष्ट्र)
– पियुष गोयल (महाराष्ट्र)
– डॉ. अरविंद सावंत (महाराष्ट्र)
राज्यमंत्री –
– रावसाहेब दानवे (महाराष्ट्र)
– रामदास आठवले (महाराष्ट्र)
– संजय धोर्ते (महाराष्ट्र)