‘सेवाग्राम’ संस्थेच्यातर्फे काश्मीरमध्ये ‘जोडो भारत’ अभियान
पुणे :
‘सेवाग्राम’ संस्थेच्या वतीने काश्मीरमधील जनतेची मने उर्वरित भारताशी जोडण्यासाठी ‘जोडो भारत’ अभियान सुरू करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
काश्मीरमधील अस्थिर परिस्थितीचा विचार करता भारतीयांनी काश्मीरमध्ये जाऊन भेटी, संवाद आणि सेवा प्रकल्पाद्वारे त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, या संकल्पनेनुसार ‘सेवाग्राम’चे ‘जोडो भारत’ अभियान काम करणार आहे.
महात्मा गांधी यांच्या विचारानुसार हे अभियान काम करणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी विनायकराव पाटील अलीकडेच 3 वेळा काश्मीरला जाऊन उपक्रमांचे नियोजन करून आले आहेत.
2 ऑक्टोबर, गांधी जयंती रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सिंह, यांच्यासमवेत श्रीनगर लाल चौक येथे जाऊन भारतीय झेंडा फडकविण्यात आला. आणि जवान तसेच स्थानिक नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. ‘बंधू भावाच्या मानसिकतेतून काश्मीरमध्ये काम करणे आवश्यक असून, तशी योजना ‘जोडो भारत’ अभियानाअंतर्गत आखण्यात आली आहे,’ असे विनायकराव पाटील यांनी सांगितले.
स्वतःची कवठा (लातूर) येथील शेत जमीन विकून पाटील यांनी या अभियानासाठी निधी संकलन केले आहे.
सीमेवर भिंत बांधण्याबरोबर काश्मिरी जनतेच्या मनातील गैरसमजाच्या भिंती तोडणे आवश्यक असल्याचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिले आहे. त्यासाठी काश्मिरी जनतेशी चर्चेचा मार्ग सुरु ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. विविध क्षेत्रातील बिगर सरकारी शिष्ट मंडळ काश्मिरी जनतेशी चर्चा करायला पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. विनायकराव पाटील यांनी लातूर दुष्काळात 2 कोटी लीटरची ‘सेवाग्राम वॉटर बँक’ उभारून स्वखर्चातून पाणीपुरवठा केला होता. तसेच काश्मिरी जनतेच्या, युवकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी 5 हजार पत्रे युवकांना पाठवली आहेत.