मुंबई – जेष्ठ अभिनेते, लेखक आणि नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरु येथील राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवस ते आजारी होते. अखरे सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. एक था टायगर, टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. तर ययाति, तुघलक. हयवदन ही त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली आहेत. गिरीड कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे.कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसेच 1998 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
चळवळ्या कार्यकर्ता
वयाची पंच्च्याहत्तरी पार केल्यानंतरही कर्नाड कार्यरत होते. सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे व साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावत होते. आपली मतं ठामपणे मांडत होते. गिरीश कर्नाड यांनी त्यांची मतं वा भूमिका कधीच लपवल्या नाहीत. देशातील वाढती असहिष्णुता व साहित्यिक, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात त्यांनी नीडरपणे आवाज उठवला. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या स्मृतिदिनी ‘मी सुद्धा अर्बन नक्षल’ म्हणत ते एका कार्यक्रमात सहभागी झाले. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. देशातील पुरोगामी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते.
माथेरान ते ऑक्सफर्ड
गिरीश कर्नाड यांचा एकूण प्रवास प्रेरणादायी होता. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान इथं १९ मे १९३८ साली त्यांचा जन्म झाला. कर्नाटक विद्यापीठातून १९५८ साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढं फेलोशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं त्यांनी एमएची पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. अफाट वाचन, चिंतन आणि प्रयोगशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यांच्या साहित्य व नाट्यकृतीतून त्यांची ही सर्जकता सतत प्रतिबिंबित होत राहिली.